पंतप्रधान हे शेतकरी, कष्टकऱ्यांना दाबण्याचे काम करत आहेत!
शेतकरी, कष्टकऱ्यांना दाबण्याचे काम पंतप्रधान करत आहेत !
अकोला, दि. ७ फेब्रुवारी:
भाजप आणि पंतप्रधान फक्त मुठभर भांडवलदारांचा विचार करत आहेत. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचे काम पंतप्रधान करत आहेत. ज्या संसदेच्या पायथ्याशी मोदी नतमस्तक झाले तीच संसद आज द्वेषापाई बदलली जात आहे त्याजागी नवीन संसद बनवली जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना केला.
राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्याचा आजचा अकरावा दिवस असून ही यात्रा अकोला येथे पोचली आहे.
देशाची अर्थव्यवस्था भाजपने कमकुवत केली आहे म्हणून यांना इंधनावर कर आकारावे लागत आहेत. त्यामुळे इंधनाचे दर वाढवले जात आहेत. अशा लोकांशी आपल्याला पुढे सामना करायचा आहे त्यामुळे आपण आपले संघटन मजबूत करा असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून एक विचार आहे. फुले – शाहू – आंबेडकरांच्या विचारांना गती देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. आपण अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पक्षाची व्याप्ती वाढविण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा काढली आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
अकोला येथे अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे मला विश्वास आहे, की पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस चांगली कामगिरी करेल. महाराष्ट्रात हा आपला पक्ष आपल्याला वाढवायचा आहे. काँग्रेस, शिवसेना सोबत आहेतच, महाविकास आघाडीच्या नियमांना कोणताही धक्का न लावता राष्ट्रवादी काँग्रेस कशी मोठी होईल याचा प्रयत्न आम्ही करू असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.
यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, संतोष कोरपे, रवी राठी, माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम सिस्कार, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
