कोकणला दिलेली मदत अपुरी;अजून पंचनामेही अपूर्णच !
अलिबाग, दि. ३० जून २०२०
कोकणातील निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेले कोकणवासीय अजूनही सावरले नाहीत. राज्य सरकारने नुकसानभरपाईची केलेली घोषणा ही अतिशय तुटपुंजी आहे. इतक्या दिवसानंतरही येथील चित्र अतिशय विदारक आहे. या ठिकाणचे पंचनामे अजूनही अपूर्ण आहेत. चक्रिवादळग्रस्तांना नुक सानभरपाई देतानाचे निकषही चुकीचे असून यामुळे जनतेच्या पैशांचाच अपव्यय होत आहे. त्यामुळे चक्रिवादळग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई द्या, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना दरेकर म्हणाले की, निसर्ग वादळामुळे झालेले नुकसान साधारणता ७० ते ७५ टक्के इतके आहे. उद्ध्वस्त झालेल्या नुकसानीचे काही पंचनामे पूर्ण झाले असून काही अजूनही अपूर्ण आहेत. काही घरांचे केवळ पत्रे उडाले आहेत अशांना देखील दीड लाखांची मदत करण्यात येते. काही नुकसान झाले नाही अशांना देखील दीड लाख रुपये मिळणार असतील तर हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. एका गावात दहा लोकांचा पंचनामा होत असताना बाकीच्या वीस लोकांचा पंचनामा होत नसेल तर यामागे राजकीय पाठबळ आहे का याचीही चौकशी व्हा,वी अशी मागणी दरेकर यांनी केली.
दरेकर म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठ मोठ्या निधीची घोषणा करून कोकणच्या जनेतला खोटी आश्वासने दिली. तरी येथे राज्य शासनाचा नेमका किती निधी आला,जाहीर केलेला किती निधी वितरित करण्यात आला,वितरणात काही प्रशासकीय अडचणी आहेत का त्याचबरोबर आणखी कशाप्रकारे यांना मदत करता येईल या उद्देशाने रायगड जिल्ह्याचा दौरा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरेकर म्हणाले, बागायतदारांचे नुकसान झाले त्यासाठी शेतकऱ्यांना ५० हजार इतकी तुटपुंजी मदत सरकारने जाहीर केली. झाडांसाठी नुकसानभरपाई देत असताना प्रत्येक झाडामागे नुकसानभरपाई द्या ही मागणी असताना ५० हजार हेक्टरी मदीतची घोषणा राज्य शासनाने केली ही अत्यंत तुटपुंजी आहे. या मदतीचा कोकणवासीयांना काडीमात्र उपयोग होणार नाही.एक झाड पंधरा ते वीस वर्ष उत्पन्न देते. इतक्या वर्षाचं पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर ५० हजार इतकी राज्य शासनाची मदत कूचकामी आहे, असे दरेकर म्हणाले.
