राहुल गांधी प्रामाणिक योद्धे !
राहुल गांधी प्रामाणिक योद्धे !
लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते..
मुंबई, दि. 7 जानेवारी:
दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना राहुल गांधींचे भय वाटते. तसे नसते तर ऊठसूट गांधी परिवाराच्या बदनामीच्या शासकीय मोहिमा राबविल्या गेल्या नसत्या. लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते. राहुल गांधींचे भय त्या शंभर पटीतले आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात राहुल गांधी यांचे कौतुक करण्यात आले आहे.
राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास होकार देताच रॉबर्ट वाड्रांच्या घरी आयकर विभागाचे पथक पोहोचले. म्हणजे वाड्रा यांच्या घरावर आयकर विभागाने ‘रेड’ टाकली. हा योगायोग नक्कीच नाही. रॉबर्ट हे सोनिया गांधी यांचे जावई आहेत. त्यांच्याबाबत अनेक विवाद आहेत, पण तरीही केंद्रीय तपास यंत्रणांचा अतिरेकी गैरवापर करून गांधी परिवाराचा छळ करण्याची ही पद्धत योग्य नाही. आयकर विभाग, ईडी वगैरे संस्था या कमालीच्या प्रामाणिक आहेत. त्यांच्या राजकीय निष्ठेविषयी अजिबात शंका घेता येणार नाही. जोपर्यंत राजकीय मालक इशारे करत नाहीत तोपर्यंत हे निष्ठावान लोक उगाच कुणाच्या घरी जाऊन दारावर टकटक करणार नाहीत. त्यामुळे या मंडळींना दोष देण्यात अर्थ नाही.
गांधी परिवारातील सदस्यांकडून खरोखरीच फौजदारी गुन्हे घडले असतील तर त्यांच्यावर कारवाई होऊ नये असे कोणीच म्हणणार नाही, पण जेव्हा अशा तर्हेच्या गुन्ह्यांच्या आरोपांचा पद्धतशीर प्रचार होतो आणि ‘‘फास आवळला जात आहे’’ असली भाषा मुद्दाम पसरविली जाते तेव्हा या हालचालीमधले राजकारण स्पष्ट होते.
भाजपच्या विरोधात उभे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर असा हल्ला सुरू आहे. विरोधकांच्या पैशांचे व्यवहार खणून काढले जात आहेत. या उत्खननात हाती लिंबू लागला तरी भोपळा हाती आल्याची बोंब मारली जाते. त्यामुळे लोकांना या बोंबलण्यात रस राहिलेला नाही. पण देशातले भाजपचे नेते व त्यांना धनपुरवठा करणारे व्यापारी मंडळ हे पाक, साफ आहे व केंद्रीय तपास यंत्रणांच्या दृष्टीने त्यांचे वर्तन हे स्वच्छ आहे काय?
परदेशातून काळे धन आणायची गर्जना तर पंतप्रधान मोदी यांनीच केली आहे. या काळ्या धनवाल्यांनी ‘पीएम केअर्स फंडा’त गुप्त दान करून स्वतःला शुद्ध करून घेतले आहे याची चौकशी कोणत्या न्यायालयात होणार आहे?
विरोधी पक्षाशी मतभेद असू शकतात, पण विरोधी पक्षाचा गळा आवळून त्यांचे मृतदेह दिल्लीच्या विजय चौकात लटकवायचे धोरण धक्कादायक आहे.
राहुल गांधी हे कमजोर नेते आहेत असा प्रचार करूनही ते अद्याप उभेच आहेत व मिळेल त्या मार्गाने सरकारवर हल्ले करीत आहेत. माध्यमांच्या मानेवर सुरे टेकवून विरोधी पक्षाला कमजोर केले जाईल, पण विरोधी पक्ष हा कधीतरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उभा राहील तेव्हा दाणादाण उडेल. देशाचा इतिहास हेच सांगतोय. असे या अग्रलेखात म्हटले आहे.
