देश पुन्हा एकजुटीने उभा करण्याचे काम करावे लागेल!
देश पुन्हा एकजुटीने उभा करण्याचे काम करावे लागेल!: बाळासाहेब थोरात
भारताला एक शक्तीशाली राष्ट्र म्हणून ओळख देण्यात काँग्रेसचे मोलाचे योगदान.
मुंबई, दि. २८ डिसेंबर:
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस पक्षाचे महत्वाचे योगदान राहिले आहे. स्वातंत्र्याआधी व स्वातंत्र्यानंतरही सर्वांना बरोबर घेऊन देशाला उभे करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. पंडित जवाहरलाल नेहरूजी यांनी विकासाची मुहूर्तमेढ लावली ती पुढे लालबहाद्दुर शास्त्री, इंदिराजी, राजीवजी यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथावर राहिली. देशात विविध स्वायत्त संस्था उभ्या राहिल्या, औद्योगिक विकासाची गंगा वाहिली. मोठ-मोठे प्रकल्प उभे राहिले. इंदिराजी गांधी यांनी भारत एक शक्तीशाली देश असल्याची ओळख जगाला करुन देण्याचे काम केले. परंतु दुर्दैवाने २०१४ नंतर देशातील वातावरण बदलले आहे. जाती-धर्मात विष कालवण्याचे, समाजा-समाजात तेढ निर्माण करून सत्ता मिळवण्याचे काम सुरु आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे ते चिरडून टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. भाजप सरकार देश रसातळाला घेऊन जात आहे परंतु पुन्हा एकदा सर्वांना बरोबर घेऊन एकजुटीने देश उभा करण्याचे काम करावे लागणार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
टिळक भवन येथे काँग्रेस स्थापना दिवस कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होते. यावेळी थोरात यांच्यासोबत, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, कार्याध्यक्ष मुज्जफर हुसेन, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी मंत्री नसिम खान, माजी मंत्री सुरेश शेट्टी, मा. खा. हुसेन दलवाई, सरचिटणीस व मा. आ. मोहन जोशी, चंद्रकांत हांडोरे, सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, राजेश शर्मा, राजाराम देशमुख, सेवादलाचे कार्यकर्ते, काँग्रेसचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
थोरात पुढे म्हणाले की, देशाच्या स्वांतत्र्यलढाईत १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर एका नेतृत्वाची गरज होती त्यातून १८८५ साली राष्ट्रीय सभेची म्हणजे काँग्रेसची स्थापना झाली. लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने देशात एक लढा उभा केला. काँग्रेसच्या स्थापनेमुळे भारत एक राष्ट्र म्हणून जगाला ओळख झाली. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभर आंदोलने करून ब्रिटिश सत्तेच्या विरोधात संघर्ष केला. मीठाचा सत्याग्रह, अहसहकार चळवळीच्या माध्यमातून देशात सर्वांना बरोबर घेऊन एक लढा उभा राहिला. १९४२ ला चले जाव ची हाक दिली गेली आणि नंतर १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य लढ्यात सर्व देश एकजुटीने काँग्रेसच्या झेंड्याखाली एकवटला. भारताला एक वैभवशाली राष्ट्र म्हणून उभे करण्यात काँग्रेसची महत्वाची भूमिका राहिली आहे. आजची परिस्थीती वेगळी आहे ती बदलण्याचे काम करावे लागणार आहे असेही थोरात म्हणाले.
