काही मंडळी राजकारण करीत आहेत !
काही मंडळी राजकारण करीत आहेत !
अशोक चव्हाण यांचे विरोधकांना प्रत्युत्तर.
मुंबई, दि. 24 डिसेंबर:
मराठा समाजाला आर्थिक मागास प्रवर्गाचा लाभ देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्यानंतर टीकेची झोड उडालेली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारच्या भूमिकेत गडबड असल्याचा आरोप खासदार संभाजीराजे यांनी केला आहे. तर विरोधी पक्ष व काही संघटनांनीही यावर टीका केली आहे.
टीका करणा-यांना अशोक चव्हाण यांनी ही प्रत्युत्तर दिले आहे. अशोक चव्हाण म्हणाले, ‘ सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे तुर्तास मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर प्रतिबंध आल्यानंतर अनेकांनी अशी मागणी केली होती की, एसईबीसी आरक्षणाचा लाभ मिळत नसेल तर नुकसान कमी करण्यासाठी मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचे लाभ देण्यात यावे. राज्य मंत्रिमंडळाने तसा निर्णय सुद्धा घेतला होता. परंतु समाजात यावर एकमत नव्हते. काही नेत्यांनी या निर्णयाला विरोध केल्यामुळे तो निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला होता.
परंतु दरम्यानच्या काळात अनेक विद्यार्थी उच्च न्यायालयात गेले. एसईबीसी आरक्षणावर तूर्तास प्रतिबंध असल्याने आम्हाला ईडब्ल्यूएसचे लाभ देण्यात यावे, अशा १०-१२ याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. या याचिकांवर औरंगाबाद व मुंबई खंडपीठाने मराठा समाजातील संबंधित विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारने यासंदर्भात भूमिका निश्चित करावी असेही न्यायालयाने सांगितले होते.
एसईबीसी आरक्षणाचा लाभ मिळत नसल्यास कायद्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना ईडब्ल्यूएसच्या लाभापासून वंचित ठेवता येणार नाही. पैसे खर्च करून सर्व विद्यार्थी उच्च न्यायालयात जाऊन ही सवलत मिळवणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर एसईबीसी प्रवर्गाला ऐश्चिक स्वरूपात ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु काही मंडळी यावर राजकारण करीत आहेत, असे ही चव्हाण म्हणाले.
