मोदींना आताच शेतकरी का आठवला?
निवडणूका आल्या किंवा अडचणीत आले, की शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा होतात.
मुंबई दि. २४ डिसेंबर:
निवडणूका आल्या किंवा अडचणीत आले, की शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा होतात असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (उद्या) शेतकरी सन्मान निधी खात्यात ६ – ६ हजार रुपये पाठवणार आहेत. त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
६ हजार रुपये शेतकर्यांना देता आणि त्यांना पैसे परत करण्यासाठी नोटीसाही पाठवत आहात हे काय चाललंय असा सवाल करतानाच उद्या शेतकर्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत मात्र या संवादाला भाजपाचेच कार्यकर्ते बसलेले दिसतील आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खोटा प्रचारही करण्याचा प्रयत्न करतील अशी टीकाही नवाब मलिक यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे पुण्यात आंदोलन करत आहेत. एक विरोधी पक्षनेते आणि दुसरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना विदर्भ आणि मराठवाड्यात कोण विचारत नसल्याने त्यांच्यावर ही वेळ आल्याचेही नवाब मलिक म्हणाले.
भाजप हा कधीच शेतकर्यांचा पक्ष राहिलेला नाही. शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष आहे अशी जोरदार टीकाही नवाब मलिक यांनी केली आहे.
