महाराष्ट्रासाठी कोरोनासंदर्भातील गूड न्यूज !
राज्यात तिसऱ्यांदा विक्रमी संख्येने कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी !
कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्यांची बुधवारची संख्या ४१६१.
मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे.
मुंबई, दि. २४ जून २०२०
कोरोनाने मुंबईसह महाराष्ट्राची झोप उडवली असताना बुधवारचा दिवस काहीसा दिलासा देणारा ठरला. बुधवारी बरे होऊन घरी जाणाऱ्यांची विक्रमी म्हणजे ४१६१ होती.
एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने बरे झालेल्यांची ही तिसरी घटना. याआधी २९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून १५ जून रोजी ५०७१ एवढे रुग्ण बरे होऊन एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. आणि बुधवारी २४ जून रोजी पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
आतापर्यंत ७३ हजार ७९२ रुग्ण बरे झाले असून मुंबई मंडळातील मुंबई महानगरपालिका, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात बुधवारी ३५३० रुग्ण घरी सोडण्यात आले. राज्यात मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५१ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर कायम असून ही दिलासा देणारी घटना आहे.
