विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास जबाबदार कोण?
आघाडी सरकारच्या काळात शिक्षणाचा बट्याबोळ.
उस्मानाबाद, दि. २१ नोव्हेंबर
राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने आधी घेतला व नंतर तो फिरविला. स्थानिक प्रशासन निर्णय घेईल असे शिक्षण मंत्र्यांनी जाहिर केले. पण जे महाराष्ट्रात सत्तेवर आहेत, त्यांची सत्ता असलेल्या मुंबई, ठाणे महापालिकेतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जातो. मग उस्मानाबद, बीड, हिंगोली येथील विद्यार्थी व शिक्षकांना कोरोनाची लागण होण्याची भीती नाही का.त्यांच्याबद्दल वेगळा न्याय का, असा सवाल विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
शाळा सुरु करण्याच्या सरकारच्या धरसोड भूमिकेचा समाचार घेत दरेकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने शिक्षणाचा बट्याबोळ केला आहे. शिक्षण विभागाची प्रत्येक विषयात धरसोडवृत्ती आहे. कोणत्याही घटकाला विश्वासात न घेता निर्णय घ्यायचा व त्यावर टीका झाली की तो मागे घेण्याचे काम शिक्षणमंत्री करित आहेत. या सरकारच्या निर्णयात कुठेही एक वाक्यता नाही, विसंवाद आहे. बिघडलेल्या अवस्थेत हे सरकार आहे.
उस्मानाबाद मधील श्रीपतराव हायस्कूलच्या जवळपास ५० शिक्षकांना कोरोनाची लागण झाली उद्या येथील विद्यार्थ्यांना कोरोना झाला तर त्याला जबाबदार कोण. एका बाजूला कोरोनाची लाट येण्याची भीती सरकारच व्यक्त करते आणि दुसऱ्या बाजूला शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात येतो. हा सरकारमध्ये विरोधाभास आहे, असेही दरेकर म्हणाले.
