कार्तिकी वारीलाही विठोबाचं दर्शन नाही !
कार्तिकी वारीलाही विठोबाचं दर्शन नाही !
पंढरपुरात संचारबंदी, बससेवा ही बंद .
पंढरपूर, दि. 20 नोव्हेंबर:
कोरोनाने रुग्ण मागील काही दिवसापासून वाढत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाचा हा धोका ओळखून पंढरपूरच्या कार्तिक वारीलाही विठोबाचं दर्शन बंद राहणार आहे.
कोरोना प्रसाराची भीती असल्याने कार्तिकी वारी काळात पंढरपुरात संचारबंदी लागू केली जाणार आहे. त्याचबरोबर चार दिवस बस सेवाही बंद राहणार आहे अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असून राज्य सरकारबरोबरच जिल्हा प्रशासनाकडूनही उपाययोजना केल्या जात आहेत. करोनाचा धोका टाळण्यासाठी पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंढपूरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपासून २६ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत पंढरपूरकडे येणारी एसटी बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. कार्तिकी एकादशीचा सोहळा २६ नोव्हेंबर रोजी होत असल्यानं दशमीपासून म्हणजेच २५ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपासून एकादशीच्या रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजेच २६ नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर शहरासह परिसरातील ५ ते १० किलोमीटरपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक झेंडे यांनी दिली.
ज्या भाविकांनी अथवा दिंड्यांनी पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण केलं असेल, त्यांनी परत जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भाविकांना व दिंड्यांना सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरूनच परत पाठविण्यात येईल. भाविकांनी मंदिर अथवा चंद्रभागेपर्यंत जाऊ नये यासाठी मंदिर व चंद्रभागा परिसराला तिहेरी बॅरिकेटिंग केलं जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
कार्तिक वारी काळात पंढरपुरात असणाऱ्या काही मोजक्या महाराज मंडळींना कोरोनाचे नियम पाळून चंद्रभागा स्नान व नगर प्रदक्षिणेला काही मूभा देण्याबद्दल सध्या विचार सुरू आहे.
