…तोपर्यंत वीज ग्राहक मेळावे होऊ देणार नाही!
…. तोपर्यंत वीज ग्राहक मेळावे होऊ देणार नाही..
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा इशारा.
मुबंई दि. १७ नोव्हेंबर:
राज्य सरकार जोपर्यंत वाढीव वीज बिलाबाबत निर्णय घेणार नाही, तोपर्यंत वीज ग्राहक मेळावे होऊ देणार नाही, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे तसेच ४ महिन्यांपासून सरकार टोलवाटोलवी करत आहे, अगोदर ग्राहकांना दिलासा द्या असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सरकारने वीज बिल सवलतीबाबत यू-टर्न घेतलाय. कोरोना काळात वीज बिल माफीची लोकप्रिय घोषणा केली. परंतु आता वाढीव वीज बिलातून ग्राहकांना दिलासा मिळणार नाही,मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत,असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. त्यासंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की, वीजबिलं चुकीची, वाढीव दिलेली आहेत.
सत्तारूढ व विरोधी पक्षाच्या सदस्यांची समिती गठीत करा, मग “दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.” कोरोनाच्या नावाखाली तुम्ही जनतेला लुटले. हा सरकार पुरस्कृत मोठा घोटाळा आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
