मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा.

0
IMG-20201012-WA0032

कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही …..

मुंबई, दि. ७ नोव्हेंबर :
मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करताना मास्क न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुंबईत कोरोना उपचारासाठीच्या ज्या जम्बो सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यांची देखभाल दुरूस्ती करावी. जेणेकरून आगामी काळात गरज भासल्यास त्यांचा वापर करता येईल. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून राबविण्याचे विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, जनतेला दिवाळी सुखाची जावी यासाठी आपण सर्वांनी सतर्कता बाळगत जनजागृतीच्या माध्यमातून कोरोनाचा धोका संपला नसल्याची जाणीव करून द्यावी. प्रदूषण कमी झाले नाही तर कोरोनाचे संकट कायम राहील ही बाब नागरिकांना पटवून द्यावी, असे आवाहन त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केले.

रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिकांमध्ये मास्क न वापरण्याबाबत बेफिकीरी दाखविली जात आहे. तसे न करता मास्क वापरण्याबाबत मोहीम  अधिक तीव्र करावी. कायद्याचा धाक दाखवितानाच जनजागृतीवर अधिक भर देऊन मास्क वापरण्याचे आवाहन करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना उपचारासाठी जी जम्बो सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत त्याची भविष्यात गरज भासू शकते ही बाब लक्षात घेऊन नियोजन करावे. या सेंटर्सची आवश्यक तेथे देखभाल दुरुस्ती करून घ्यावी. औषधांची उपलब्धता ठेवावी. या सेंटर्समधील कर्मचाऱ्यांना सुटी देण्याचे नियोजन करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्य शासन टप्प्याटप्प्याने अनलॉक करीत आहे त्यामुळे गर्दी नियंत्रण आवश्यक असून दिवाळी आणि त्यानंतरचे १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगतानाच ज्यांचा लोकांशी कायमच संपर्क येतो असे विक्रेते, बस चालक, वाहक यांची सातत्याने चाचणी करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *