कोविड-१९ ने राज्यातील ४७ पोलिसांचे मृत्यू, अजून १००१ कोरोनाबाधित !
कोविड-१९ ने राज्यातील ४७ पोलिसांचे मृत्यू, अजून १००१ कोरोनाबाधित !
मुंबई दि. २२ जून २०२०
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात महाराष्ट्र पोलिसांचा मोठा सहभाग आहे परंतु या कोरोनाच्या लढाईत दुर्देवाने राज्यभरातील ४७ पोलिसांचा कोवीड-१९ मुळे मृत्यू झाला आहे. यात मुंबईतील ३१ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३२, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण १ व पालघर १ अशा ४७ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला आहे तर सध्या ११८ पोलीस अधिकारी व ८८३ पोलीस कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांना कोरोनाची काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
एकीकडे आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस दल हे कोरोनायोद्धे आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र मेहनत करत असताना काही दुष्टप्रवृत्तीचे लोक, समाजकंटक मात्र त्यांच्यावर हल्ला करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पोलिसांवर हल्ला होण्याच्या २७५ घटना घडल्या असून यासाठी जबाबदार ८५४ व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. कोरोनायोद्ध्यांवर हल्ले करणाऱ्या समाजकंटांकावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत, असेही गृहमंत्री म्हणाले.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित असून सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहनही गृहमंत्री देशमुख यांनी केले आहे.
