उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व सोयीप्रमाणे बदलणारे!
मुंबई, दि. 26 ऑक्टोबर:
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाच्या सर्वोच्चपदी असणाऱ्या लोकांबद्दल अगदी अर्वाच्य भाषेचा उपयोग केला. तुम्ही राज्यप्रमुख आहात, याचा कदाचित तुम्हाला विसर पडला असल्याची प्रचिती आली. कालच्या भाषणात पुन्हा एकदा तथाकथित हिंदुत्वाच्या नावाने गाजावाजा केला. मात्र सत्तेच्या लालसेपोटी सोयीनुसार तुम्ही हिंदुत्वाची व्याख्या बदलत आहात, हे प्रकर्षाने जाणवतंय. बाळासाहेबांच्या नावाने अजुन किती दिवस पोळ्या भाजणार? खुर्चीसाठी त्यांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीचे पालन करणं तुम्ही विसरला आहात, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
पाटील पुढे म्हणाले, ‘ज्यांच्या स्मारकाठिकाणी तुमचा कार्यक्रम चालला होता, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हिंदुत्वदेखील तुमच्या पचनी पडले नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याच मार्गांवर आम्ही चालत आहोत. सरसंघचालकांनी कालच्या भाषणात एक वक्तव्य केलं, ‘हिंदू, हिंदुत्त्व, हिंदुराष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग है’, हे मुळात तुमच्यासाठी होतं. हिंदुत्वाचा वापर करून आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी तुमचा हा सगळा आटापिटा सुरु आहे. तुमच्याकडून आम्हाला हिंदुत्व शिकून घेण्याची गरज नाही कारण तुमचं हिंदुत्व हे सोयीप्रमाणे बदलत असतं.
मी कुटुंबप्रमुख आहे, असं तुम्ही म्हणालात. याशिवाय काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी दौऱ्यावेळी ‘हे शेतकऱ्यांचं सरकार आहे’, असं वक्तव्य तुम्ही केलं होतं. मग जे कुटुंब बळीराजाच्या जीवावर चालतं त्यांच्याबद्दल एकही शब्द न बोलता जाणीव पूर्वक शेतकऱ्यांच्या सद्यपरिस्थितीचा उल्लेख करणं टाळलं. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरही देखील चिडीचूप बसलात. केवळ आपलेच ढोल बडविण्यात तुम्ही समाधान मानलं. एकंदरीत मुख्यमंत्र्यांचं भाषण हे अभ्यासशून्य व सूड भावनेने प्रेरित होते. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, ११ कोटींचं कुटुंब तुम्हाला सांभाळायचं आहे. केवळ भाषणबाजी करून काहीही होणार नाही, असेही पाटील म्हणाले.
