मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ भूमिकेचे कौतुक !
मुंबई, दि. २४ ऑक्टोबर:
राज्यातील मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे पत्र पाठवले त्या पत्रातील भाषा व राज्यापालंची भूमिका यावरुन मोठा वादंग झाला. राज्यपालांनी मर्यादा ओलांडल्या, पदाची न शोभणारे वर्तन केले अशी टीका झाली त्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सडेतोड उत्तर दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे राजकीय वर्तुळातून आणि समाज माध्यमातून कौतुक करण्यात आले.
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिकांसह शेकडो साहित्यिकांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे कौतुक केले आहे.
या पत्रात असे म्हटले आहे की,”जेव्हा प्रश्न श्रद्धांचा असतो तेव्हा अशी ठाम भूमिका घेणे राजकीयदृष्ट्या कठीण असले, तरी आपण ती ठामपणे घेतली आणि धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने उभे राहिलात व त्याची राज्यपालांनाही स्पष्ट शब्दांत जाणीव करून दिली त्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार. घटनेतील धर्म-स्वातंत्र्यासंबधीचे कलम २५ हे आरोग्याला बाधा येत असल्यास आवश्यक ते प्रतिबंध धर्म-स्वातंत्र्यावर लावण्याचा अधिकार सरकारला देते. लोकांच्या श्रद्धांचा राजकारणासाठी उपयोग आक्षेपार्ह आहे. असा श्रद्धांचा उपयोग करून केलेले राजकारण यशस्वी झाले व त्यातून देवळे उघडली गेली, तर ते भाविकांसाठीच धोक्याचे ठरू शकते”.
“मंदिरं उघडण्यासाठी राज्यपालांनी आपल्यावर दबाव आणला आणि ‘सेक्युलॅरिझम’ला उघड विरोध केला. या स्थितीत आपल्या शासनापुढे दोन पर्याय होते. एकतर लोकांच्या आरोग्याचा विचार करायचा वा लोकांच्या श्रद्धांचा विचार करायचा. सेक्युलॅरिझमचे तत्व असं की, लोकांच्या ऐहिक हिताच्या आड त्यांच्या श्रद्धा येत असतील, तर शासनानं ठामपणे सेक्युलॅरिझमच्या बाजूनं उभं राहावं. पण राज्यपालांनी तुम्ही लोकांच्या श्रद्धांच्या बाजूनं उभं राहावं, अशी भूमिका घेतली”, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल कौतुक करण्यात आले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, शांता गोखले, दिलीप प्रभावळकर, जयंत पवार, नीरजा, डॉ. हेमचंद्र प्रधान, विश्वास उटगी, मिलिंद मुरूगकर, मंजिरी मणेरीकर, भारती शर्मा, मुक्ता दाभोलकर, अनिष पटवर्धन, लोकेश शेवडे, सुनील वालावलकर, भूषण ठाकूर यांच्यासह दोन हजार मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणाऱ्यांत समावेश आहे.
