दोन दिवसात नुकसान भरपाई!
मुंबई, दि. 21 ऑक्टोबर:
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी होत होती. मुख्यमंत्री दोन दिवसांपासून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आज उस्मानाबाद दौ-यावर असताना मदतीबाबत त्यांनी घोषणा केली.
दोन ते तीन दिवसांत मंत्रीमंडळ बैठक घेऊन मदतीचा निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘ महाराष्ट्र मला नवीन नाही. यापूर्वी जेव्हा आलो तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो. तुमच्या वेदना, व्यथांना आवाज देण्याचे काम मी तेव्हा करत होतो. माझे कर्तृत्व शून्य आहे, पण तुमच्या आशिर्वादामुळे मुख्यमंत्री झालो आहे.
‘आजची परिस्थिती भयानक आहे. आपण संकटाचा सामना केला नाही असे काही नाही. वर्षाची सुरुवातच जागतिक संकटाने झाली आहे. बाहेर पडू म्हणताच निसर्ग वादळ आले आणि जाता जाता पावसाने तडाखा दिला.’
‘जवळपास ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. लवकरात लवकर आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार वचनबद्ध आहे. आकडे लावण्यासाठी मी आलेलो नाही. जे करु तुमच्या सुखासाठी करु. धीर सोडू नका, खचून जाऊ नका’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
