लाॅकडाऊन संपलाय, कोरोना नाही !
नवी दिल्ली, दि. 20 ऑक्टोबर:
कोरोनाचे संकट अजून टळलेलं नाही, लढाई अजून सुरूच आहे. अनलाॅकमुळे बाजारात काहीशी चमक दिसू लागली आहे. लाॅकडाऊन संपला असला तरी व्हायरस गेलेला नाही हे विसरु नका असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला संबोधित करताना बजावले.
अमेरिका आणि ब्राझिलची स्थिती भारतापेक्षा वाईट आहे. आपण कोरोना विरुध्द चांगला लढा देत आहोत. आज भारतात कोरोना रुग्णांसाठी ९० लाखांपेक्षा जास्त बेड्स उपलब्ध आहेत. १२ हजार क्वारंटाइन सेंटर्स आहेत. देशातल्या चाचण्यांनी १० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाविरोधात लढताना जास्तीत जास्त चाचण्या करणे ही आपली ताकद आहे.
लस येत नाही तोवर आपल्याला कोरोनाविरोधात लढाई सुरुच ठेवायची आहे. कोरोनाची लस जेव्हा येईल तेव्हा प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचेल यासाठी सरकारची तयारी सुरु आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहचावी यासाठी सरकारची तयारी झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी लोकांच्या निष्काळजी पणावर नाराजी व्यक्त केली. सावधगिरी बाळगून सगळे व्यवहार करा असेही त्यांनी स्पष्ट केले.
