पाडाळे धरणग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्या!
मुंबई दि २० ऑक्टोबर:
ठाणे येथील धरणाच्या कॅनॉलसाठी ज्या शेतक-यांच्या जमिनी भूसंपादीत केल्या आहेत, अशा धरणग्रस्त शेतक-यांना एक महिन्यात नुकसानभरपाई द्यावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिले आहेत.
आज विधानभवन येथे पाडाळे लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील मौजे पाडाळे येथे बांधलेल्या धरणग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणेबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव लोकेश चंद्र, उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे पाटील, उपसचिव पूर्णिमा देसाई, कार्यकारी अभियंता स.गो.गाढे ,अभियंता आणि सामाजिक कार्यकर्ते चेतनसिंह पवार आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ठाणे जिल्ह्यात उल्हास खो-यातील भामखोरी नदीवर लघु पाटबंधारे विभागाने धरण बांधले. अगोदर शेतक-यांचे पुनर्वसन करून नंतर धरण बांधण्यात येणे अपेक्षित होते. मात्र, धरण बांधून अनेक वर्षानंतरही संबंधीत धरणग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात आली नसल्याने, संबंधीत शेतक-यांना तातडीने परतावा देण्यासाठीच्या कार्यवाहीस गती देण्यात यावी. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून तातडीने संबंधित शेतक-यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात यावा असेही त्यांनी सांगितले.
तसेच, ज्या शेतक-यांच्या जमिनी कॅनॉलमध्ये गेल्या आहेत, पण यादीत त्यांचे नाव नसल्यास त्यासंदर्भातही सकारात्मक कारवाई करून नुकसानभरपाई देण्यात यावी. कृषी व वन विभागाशी समन्वय साधून तोडण्यात आलेल्या वृक्षांचे मूल्यांकन करावे असेही विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित अधिका-यांना दिले.
