‘धीर सोडू नका, सरकार तुमचं आहे!
तुळजापूर, दि. १८ ऑक्टोबर:
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आज अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मराठवाडा दौ-यावर असून शेतक-याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतक-याशी संवाद साधला.
शरद पवार यावेळी म्हणाले,’ हे संकट संपूर्ण शेती अर्थव्यवस्था उध्वस्त करणारं आहे. त्यामुळे तातडीची मदत कशी देता येईल…खरवडून गेलेली जमीन कशी सावरता येईल आणि नुकसानीतून बाहेर पडण्यास मदत कशी होईल ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलो आहोत. या संकटावर… आलेल्या अडचणींवर एकजुटीने मात करु. सध्या दिवस वाईट आहेत… अडचणीचे आहेत परंतु धीर सोडायचा नाही… यावर मात करु… सरकार तुमचं आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मराठवाडयातील अतिवृष्टीत सापडलेल्या शेतकर्यांना दिला.
पवार म्हणाले,” या संकटावर मार्ग काढावा लागेल. राज्य व केंद्र सरकारशी बोलू. नुकसानीचे स्वरूप पहाता एकंदरीत राज्य सरकारची या सगळ्याला तोंड देण्याची परिस्थिती नाही मात्र यासाठी केंद्र सरकारची मदत मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री आणि देशातील प्रमुख लोकांशी बोलून तातडीची मदत कशी देता येईल असा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले.
शरद पवार हे आज आढि उद्या मराठवाड्यातील गावांचा पाहणी दौरा करत आहेत. रविवारी पवार यांनी शेतक-याची गार्हाणी ऐकली. धीर सोडू नका आम्ही आहोत, अशा शब्द पवार यांनी शेतकर्यांना आधार दिला.
आज दुपारी राजेगाव येथे शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना लातूर जिल्हयातील किल्लारी आणि परिसरात झालेल्या भूकंपाची आठवण सांगितली. त्याठिकाणी पहाटे पोचुन लोकांना धीर दिला होता. संकटग्रस्त माणसांना उभं केलं होतं. आज तसंच संकट उभं ठाकल्याचं शरद पवार म्हणाले.
दुष्काळ आल्यावर पीकंच नष्ट होतात परंतु या संकटात जमीनच खरवडून गेली आहे. जमीनीचे स्वरूपच बदलले आहे त्यामुळे हे जास्त नुकसान आहे असे शरद पवार म्हणाले.
