मुंबईसाठी 1000 मे.वॅ. वीजेची अतिरिक्त व्यवस्था!
मुंबईला अखंडित वीजपुरवठ्यासाठी विक्रोळी 400 केव्ही उपकेंद्र प्रकल्प वेळेत पूर्ण करा.
मुंबई,दि. 16 ऑक्टोबर :
मुंबईची पुढील काळातील विजेची गरज भागविण्यासाठी विक्रोळी येथे प्रस्तावित 400 के. व्ही. जीआयएस उपकेंद्र प्रकल्पाचा आढावा घेऊन हे काम तातडीने सुरू करुन 2023 पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुंबईत नुकत्याच झालेल्या वीजपुरवठा खंडित प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून त्या अनुषंगाने वीजेशी सबंधित विविध प्रकल्पांचा आढावा ते घेत आहेत. वर्षा निवासस्थानी विक्रोळी प्रकल्पाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरु शकेल असा हा विक्रोळी प्रकल्प प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबईसाठी 1000 मे.वॅ. वीज पुरवठ्यासाठी अतिरिक्त व्यवस्था 2023 पर्यंत निर्माण करणे अपेक्षित आहे. त्यासाठी खारघर उपकेंद्र येथून 400 केव्ही वीजवाहिनी उभारणे प्रस्तावित आहे. तसेच तळेगाव-कळवा 400 केव्ही विजवाहिनीवरुन विक्रोळी पर्यंत 400 केव्ही वीजवाहिनी तसेच पडघा, नवी मुंबई या ग्रीड उपकेंद्राशी जोडणी करणे आदी बाबी समाविष्ट असून त्यामुळे मुंबईसाठी 1000 मे.वॅ. वीजेसाठीची अतिरिक्त व्यवस्था निर्माण करणे प्रस्तावित आहे, अशी माहिती प्रधान सचिव गुप्ता यांनी दिली.
ठरल्याप्रमाणे टाटा पॉवर कंपनीने पुढील आठवड्यापर्यंत विक्रोळी प्रकल्प उभारणीसाठी जागा अदानी ट्रान्समिशनला हस्तांतरीत करण्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. जागेच्या ताब्यानंतर प्रकल्पाचे काम कोणत्याही स्थितीत 2023 पर्यंत पूर्ण झाले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
0000
