दिवाळीनंतरही शाळा बंदच राहणार!
अमरावती, दि. 12 ऑक्टोबर :
कोरोनामुळे शाळा काॅलेज अजून बंदच आहेत. केंद्र सरकारने शाळा सुरुकण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असला तरी त्यासाठी अटी व नियम आहेतच. दिवाळी पूर्वी शाळा सुरू करण्यासंदर्भात चाचपणी सुरू होती पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र दिवाळी पूर्वी ते शक्य नाही असे स्पष्ट केले आहे. आता तर दिवाळी नंतरही शाळा सुरू होतील असे वाटत नाही.
शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू म्हणतात, ‘राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याचे संकेत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. मात्र, आता दिवाळीनंतरही करोनाचा संसर्ग वाढतच राहिला तर, राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सुरू करणे अशक्य राहील, असे बच्चू कडू आता म्हणत आहेत.
बच्चू कडू म्हणतात,’ ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये आणि आता दिवाळीनंतर शाळा सुरू करता येईल का, याचा विचार आपण करत होतो. मात्र, कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता दिवाळीनंतर याची दुसरी लाट आली आणि संक्रमण वाढले तर आपल्याला दिवाळीनंतरही शाळा बंद ठेवाव्या लागणार आहेत. कदाचित कोरोनाचे संक्रमण आतापेक्षा कमी झाले आणि आपल्याला वाटले की, शाळा सुरू करायला हरकत नाही. त्यावेळी त्या सुरू करता येतील. परंतु आपण जगाचा विचार केला तर, १३ हजार विद्यार्थी ब्रिटनमध्ये करोनाबाधित झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आपण खबरदारीने पावले उचलायला हवी, असे शिक्षण राज्य मंत्री म्हणाले.
