अखेर मोदींनी मौन सोडले; चीनला दिला ‘हा’ इशारा.
अखेर मोदींनी मौन सोडले; चीनला दिला ‘हा’ इशारा.
चीनला चोख उत्तर देण्याचा पंतप्रधान मोदींचा इशारा.
१९ जूनला विरोधी पक्षांबरोबर बैठक, २१ ला देशाला संबोधीत करणार.
मुंबई, दि. १७ जून २०२०
चीनने भारतीय भूभागावर घुसखोरी करुन २० भारतीय जवानांना ठार केल्यानंतर देशभरात मोदी सरकार विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.विरोधी पक्षांनीही मोदी सरकारला धारेवर धरले आहे. नेहमी कोणत्याही विषयावर ट्वीट करणारे पंतप्रधान चीनच्या संदर्भात गप्प राहिल्याने रोष वाढतच गेला. अखेर नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले आणि जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. चीनला चोख प्रत्युत्तर देऊ असा इशारा दिला आहे.
गलवान भागात सीमेवर चीन व भारताच्या जवानांमध्ये सोमवारी रात्री झडप होऊन २० भारतीय जवानांचा मृत्यू झाला. याबाबत सरकार अथवा लष्कराकडून अधिकृत महितीही दिली जात नव्हती. त्यातच महिनाभरापासून सीमेवर चीनने आगळीक करत भारताच्या भूभागात घुसखोरी केल्याच्या बातम्या येत होत्या पण सरकारी पातळीवर याबाबत काहीच खुलासा केला जात नव्हता. शेवटी २० जवान शहिद झाल्यानंतर मोदी सरकारला जाग आली आणि बैठकांचे सत्र सुरु झाले.विरोधी पक्षांनी वस्तुस्थिती काय आहे हे जनतेला सांगावे अशी मागणी लावून धरली होती. आता पंतप्रधान मोदी हे १९ जूनला सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार असून त्यानंतर ते २१ जूनला देशाला संबोधित करणार आहेत.
मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केला आहे. पाकिस्तान हे नेहमीचेच दुखणे आहे. चीनने ४५ वर्षानंतर भारताचे जवान एवढ्या मोठ्या प्रमाणावर मारले आहेत तर भारताचा नेहमीचा मित्र राहिलेला नेपाळही भारताच्या विरोधात गेल्याचे चित्र आहे.
