हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरु राहणार!
मुंबई, दि. ७ ऑक्टोबर:
कोरोनामुळे बंद ठेवण्यात आलेली हॉटेल, रेस्टारंट व बार ५ ऑक्टोबरपासून उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. परंतु हॉटेल्स, बारच्या वेळाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यासंदर्भात आता राज्य सरकारने वेळही निश्चित केली आहे.
अनलॉक -५ च्या माध्यमातून काही अटी, शर्ती घालून राज्य सरकारने हॉटेल्स, बार उघडण्याची परवानगी दिली असली तरी काही ठिकाणी स्थानिक प्रशासन रात्री सात वाजताच बार, हॉटेल्स बंद करण्यास सांगत होते. त्यामुळे बार, हॉटेल्स व्यवस्थापनांमध्ये नाराजी होती. पण राज्य सरकारने वेळा निश्चित केल्याने आता संभ्रमही दूर झाला आहे.
महाराष्ट्रातील हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत आता हॉटेल्सही सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोरोनाची परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला या निर्णयात बदल करता येईल असेही सरकारने स्पष्ट केले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहनही सरकारने केले आहे.
