महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांचा प्रचार फडणवीस करणार का?
मुंबई, दि. ६ ऑक्टोबर:
अभिनेता सुशांतसिंगच्या आत्महत्येवरून तीन महिन्यापासून राजकीय वातवरण तापलंय ते अजूनही शांत होण्याचं नाव घेत नाही. कालपर्यंत महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करुन त्यांना बदनाम करण्याचे काम एक राजकीय पक्ष व त्यांच्या समर्थकांनी केले, त्यात सोशल मीडिया व माध्यमातील काही संस्थांचाही सहभाग होता. परंतु एम्सच्या अहवाल आल्यानंतर मात्र चित्र पालटलं आहे.
एम्सच्या अहवालानंतर विरोधी पक्षांनी भाजपावर तोफ डागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देशमुख म्हणातात, ‘राज्याचं पाच वर्ष नेतृत्व करणारे आत्ताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला. बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्राची बदनामी केली. त्यासंदर्भात माझा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे की, ते गुप्तेश्वर पांडेच्या प्रचाराला जाणार का? ते आता निवडणूक लढवत आहेत, फडणवीस हे भाजपाचे बिहार निवडणूक प्रभारी आहेत. फडणवीस हे या अधिकाऱ्याच्या निवडणूक प्रचाराला जाणार का?
‘सुशांत प्रकणावरून एका राजकीय पक्षाने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. बाहेरच्या राज्यातील कठपुतलींनाही आपल्या तालावर नाचवण्याचे काम या पक्षाने केले. एम्स आणि कूपर रुग्णालयाने आपला अहवाल दिला आहे. या अहवालातून सुशांतची हत्या झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर, सुशांतच्या शरीरात विष सापडले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळं सीबीआयनंही आपला अहवाल द्यावा,’ असेही अनिल देशमुख म्हणाले.
