अवकाळी व गारपिटीचे पंचनामे करणार..
मुंबई, दि. २४ फेब्रुवारी –
राज्यात सोमवारी (तारीख २३) झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांसह कोकण व पूर्व विदर्भात रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला, फळपिके इत्यादींचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून मांडली.
यावेळी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे त्या सर्व जिल्ह्यातील प्रशासनास तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून दिले जातील, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली.
अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे गहू ज्वारी अक्षरशः जमीनदोस्त झाली असून आंबा, डाळिंब या फळांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच द्राक्ष, टरबुज अशा फळपिकांना देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळे याची तात्काळ दखल शासनाने घेण्याची गरज असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
विधिमंडळात स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून आ. विजय वडेट्टीवार यांनी देखील अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र झालेल्या नुकसानीची व्यापकता अधिक असल्याने धनंजय मुंडे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. आमदार अभिमन्यू पवार यांनीही हा विषय मांडला.
बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई यांसह माजलगाव, धारूर, केज इत्यादी तालुक्यांमध्ये देखील अवकाळीचा फटका बसला असून प्रशासनाने तातडीनं पंचनामे करून शासनास नुकसानीचे अहवाल सादर करावेत, अशी आग्रही मागणी धनंजय मुंडे यांनी सभागृहात केली. त्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देत संबंधित नुकसानग्रस्त सर्व जिल्ह्यात तातडीने पंचनामे करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.









