पळवापळवीच्या भितीने शिंदेसेनेचे नगरसेवक हॉटेलमध्ये..
पळवापळवीच्या भितीने शिंदेसेनेचे नगरसेवक हॉटेल मध्ये..
मुंबई, दि. १९ जानेवारी २०२६ :
महानगरपालिकेच्या निवडणुकी झाल्या पण अजून महापौर पदाचा कार्यक्रम बाकी असल्याने राजकीय पक्षांची चलबिचल वाढली आहे. यातूनच मुंबईत हॉटेल पॉलिटक्स सुरु झाले आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील २९ नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले आहे. पळवापळवीच्या भिती असल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हॉटेलमध्ये जाऊन या नवनिर्वाचित नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी या नगरसेवकांशी सविस्तर संवाद साधत विकास, स्वच्छता, पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी शिंदे म्हणाले की, वॉर्ड विकासासाठी सत्तेचा वापर करा, कामांचे शॉर्ट, मिड आणि लाँग टर्म नियोजन ठरवा आणि मत दिले-न दिले अशा प्रत्येक नागरिकासाठी समान न्यायाने काम करा. नगरसेवकांच्या कामातून शिवसेनेची प्रतिमा स्वच्छ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख राहिली पाहिजे. नागरिकांच्या मनात नगरसेवकांविषयी एकही चुकीचा विचार निर्माण होऊ नये, हाच आपल्या कामाचा खरा निकष असावा, असे त्यांनी ठासून सांगितले.
आपल्या प्रभागात लोकांना प्रत्यक्ष दिसून येईल असा बदल झाला पाहिजे. आपण केलेली कामे लोकांच्या लक्षात यायला हवीत. शिवसेनेची प्रतिमा डागाळली जाईल असे कोणतेही काम आपल्या हातून घडू नये, याची प्रत्येक नगरसेवकाने विशेष खबरदारी घ्यावी. स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देत संपूर्ण प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिवसेनेने 90 जागा लढवल्या व 32 टक्के मते मिळाली आहेत. विधानसभा निवडणूक असो वा ग्रामपंचायत निवडणूक, शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. महाराष्ट्रातील जनतेने काही पक्षांना पाचव्या क्रमांकावर ढकलले असून, जनतेच्या कोर्टात जाणाऱ्यांना मतदारांनी घरी पाठवले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
