ZP निवडणुकीसाठी काँग्रेसचं ठरलं..
ZP निवडणुकीसाठी काँग्रेसचं ठरलं..
मुंबई, दि. १८ जानेवारी २०२६ ;
नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी आघाडी केली त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आघाडी केली जाईल. जेथे आघाडी करणे शक्य आहे तेथे आघाडी केली जाईल परंतु घड्याळाशी आघाडी केली जाणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे संपन्न झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. विश्वजीत कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह राज्य निवड मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणनितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, लातूर व नांदेड महानगरपालिकेत दोन्ही पक्षांनी आघाडी करून योग्य पद्धतीने निवडणुकीला सामोरे गेलो. वंचित बरोबरची आघाडी ही आकड्यांचा खेळ नाही तर वैचारांचा मेळ आहे. दोन्ही पक्षामध्ये योग्य समन्वय असून जी टीका केली जात आहे ती एकांगी आहे, असे सपकाळ म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्याबदद्ल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षाचा विचार करू नये, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य विजयी पताका फडकवत असताना अमेरिकेच्या दबावाला बळी पडून नरेंदर सरेंडर का झाले, याचे उत्तर त्यांनी द्यावे, मुंबई महानगरपालिकेत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर होत नाही, याचा मोदींना आनंद झाला असावा, असेही सपकाळ म्हणाले.
