संकुचितपणा देशासाठी घातक..
संकुचितपणा देशासाठी घातक..
मुंबई, दि. २७ आक्टोबर…
जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे “एक भारत श्रेष्ठ भारत” असा नारा देत आहेत, एक देश एक कर, एक देश एक रेशनकार्ड, एक इलेक्शन या दृष्टीने वाटचाल करीत आहेत तेव्हा काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी असे म्हणत असून हा त्यांचा हा संकुचितपणाचा नारा देशासाठी घातक आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले.
माय होम इंडिया या संस्थेच्या वतीने दिला जाणारा पंधरावा “वन इंडिया अवॉर्ड २०२५” यावर्षी त्रिपुरा राज्यामध्ये जनजाती भागात उल्लेखनीय काम करणारे कार्यकर्ते मदन हरी मलसम यांना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आपल्या भाषणात म्हणाले की, ईशान्य भारत हा विविधतेने नटलेला प्रदेश आहे. कला, लोककला, खाद्य संस्कृती, वाद्य अशा विविधतेने हा प्रदेश नटलेला असून आता या प्रदेशात विकासाची गंगा वेगाने वाहू लागली आहे. विमान सेवा, रेल, रस्ते अशा सर्व कनेक्टिव्हिटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सुरू केल्या असून इतके वर्षे विकासापासून दूर राहिलेला हा प्रदेश आता विकासाच्या “महामार्गावर गतिमान” झाला आहे., असेही त्यांनी नमूद केले.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आपल्या भाषणात पूर्वी पूर्वांचल नागालँड अरुणाचल आसाम ही ईशान्य कडची राज्य पूर्णतः दुर्लक्षित होती परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर आता गेल्या दहा वर्षात आमच्या सरकारने पाच लाख कोटी रुपयांचा निधी पायाभूत सेवा सुविधांसाठी उपलब्ध करून दिला असून रेल्वे विमान अशा सर्व सुविधा आता उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आजही सर्व तिथल्या समस्या सुटल्या असे नाही, पण राष्ट्रवादाच्या भावनेने आता हा संपूर्ण प्रदेश जोडला गेला आहे. आपणही आपल्या मुंबई, पुणे, बेंगलोर अशा शहरांमध्ये या भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवायला हवा. आपण बंधू भावाने, त्यांच्याशी वागून सलोखा, मैत्री जोपासायला हवी, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
यावेळी मंत्री आशिष शेलार म्हणाले की, हे वर्षे ज्ञानेश्वर महाराजांचे 750 वे जन्मशताब्दी वर्षे असून माऊलींनी त्यावेळी विश्वकल्याणाचा विचार मांडला. आम्ही त्याच विचाराने काम करीत असून माय होम इंडिया ही संस्था याच विचाराने काम करणाऱ्यांना सन्मानित करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना मांडली असून आपण सगळे राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करणारे आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
