माधुरीला परत आणण्यासाठी सरकारचा पुढाकार..

0
20250802_091249

माधुरीला परत आणण्यासाठी सरकारचा पुढाकार..

मुंबई, दि. ५ ऑगस्ट २५ ;

नांदणी मठात गेल्या 34 वर्षांपासून महादेवी हत्तीण आहे. महादेवी हत्तीण पुन्हा मठात यावी ही जनभावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन, राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करेल. मठानेही आपल्या याचिकेमध्ये राज्य सरकारचा पक्षकार म्हणून समावेश करावा. तसेच वन विभागाच्या वतीने याबाबत सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र सविस्तर भूमिका मांडण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात  महादेवी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात बैठक संपन्न झाली.

यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,यामध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या निकषाप्रमाणे व उच्च स्तरीय समितीने सुचविलेल्या सर्व मुद्यांचे निराकरण करण्यात येईल. महादेवी हत्तीणीची योग्य निगा राखण्यासाठी राज्य सरकार डॉक्टरांच्या उपलब्धतेसह एक पथक तयार करून, आवश्यक ती सर्व मदत करेल. आवश्यकता वाटल्यास रेस्क्यू सेंटरसारखी व्यवस्थाही करण्यात येईल व त्याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या सुविधा तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र समिती नेमावी, अशी विनंतीही राज्य शासनामार्फत याचिकेमध्ये करण्यात येईल. तसेच या प्रकरणात नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गणेश नाईक, मंत्री गिरीश महाजन, मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह नांदणी मठाचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *