जनसुरक्षा विधेयकाविरोधात न्यायालयात जाणार !
जनसुरक्षा विधेयकाविरोधात न्यायालयात जाणार !
मुंबई, दि. ११ जुलै ;
महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने या विधेयकाला थेट फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर घाला असल्याचे ठामपणे सांगितले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे की, “हे विधेयक महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या ऐतिहासिक वाटचालीवर आघात करणारे असून, या विरोधात आम्ही न्यायालयात लढा देणार आहोत.”
आंबेडकर पुढे म्हणाले की, “हे विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, लोकशाही मूल्यांवर आणि संविधानावर थेट आघात करणारे आहे. आम्ही या विधेयकाचा संविधानिक मार्गाने विरोध करत राहू.”जय फुले. जय शाहू. जय भीम. जय महाराष्ट्र. जय संविधान. जय भारत.” या घोषणांनी आघाडीने आपली भूमिका अधिक ठामपणे अधोरेखित केली आहे. महाराष्ट्रातील जनतेकडून या विधेयकावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, आगामी काळात या विधेयकाविरोधातील लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडीने 1 एप्रिल 2024 रोजी विधेयक निवड समितीचे चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून आपल्या हरकती नोंदवल्या होत्या व मागणी केली होती की, हे विधेयक मागे घ्यावे. वंचित बहुजन आघाडीने या विधेयकाविरोधात आपला पवित्रा कायम ठेवला आहे.
