पहिलीपासून ‘हिंदी सक्ती नाही’चा लेखी GR काढा.
पहिलीपासून ‘हिंदी सक्ती नाही’चा लेखी GR काढा.
मुंबई, दि. ५ जून २५ ;
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ सुरु आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा असेल असं घोषित केलं गेलं. नंतर हिंदीची सक्ती नाही व महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील अशी घोषणा केली पण या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही ? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे.
राज ठाकरे यांनी जारी केलेल्या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एक भाषा. ती शिकण्याची सक्ती का केली जात होती ? कुठल्यातरी दबावाखाली सरकार घरंगळत का जात होतं हे माहित नाही. पण मुळात पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा मुलांना का शिकायला लावायच्या हा मुद्दा आहेच.
आधीच्या तीन भाषा शिकवणे आणि त्यात हिंदीचा समावेश असणे या निर्णयाचा आधार घेऊन, हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईला केंव्हाच सुरु झाली आहे. आता पुस्तकं छापली आहेत मग पुन्हा आपल्याच निर्णयावर घुमजाव करायचं असं करण्याचा सरकारचा काही डाव तर नाही ना ? असं काही नसेल असं मी गृहीत धरतो, पण असं काही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन उभं करेल त्याला सरकार जबाबदार असेल.
देशातील अनेक राज्यांनी पहिलीपासून दोनच भाषा आणि हिंदीची सक्ती झुगारून दिली, याला कारण त्या त्या राज्यांची भाषिक अस्मिता आहे. त्या इतर राज्यांसारखी तीव्र अस्मिता आपले सरकार पण दाखवेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील ( मराठी आणि इंग्रजी ) या निर्णयाचा लेखी आदेश लवकरात लवकर जारी करावा असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
