नालेसफाई होत असताना आदित्य ठाकरे कुठे होते ?
नालेसफाई होत असताना आदित्य ठाकरे कुठे होते ?
मुंबई, दि. २७ मे २५ ;
मुंबईत नालेसफाईची कामे सुरु असताना आम्ही पाहणी केली, चुकीचे आढळले तिथे प्रशासनाला सवालही विचारले. मात्र मुंबईचे लोकप्रतिनिधी असणारे आमदार आदित्य ठाकरे मुंबईत नालेसफाई होत असताना, रस्त्यांची कामे होत असताना कुठे होते.. लंडनमध्ये जावून थेम्स नदीची आणि पॅरिसमध्ये जावून सीन नदीची पाहणी करत होते का? २६ जुलै २००५ च्या महाप्रलयावेळी महानगरपालिकेचे नेतृत्व करीत असलेले उद्धव ठाकरे रस्त्यांवर उतरले होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आदित्य ठाकरे यांनी आधी द्यावीत, असा प्रहार मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार यांनी केला आहे.
मुंबईतील मुसळधार पाऊस व त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन, यंत्रणांकडून सुरु असलेली कार्यवाही याबाबत मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
याप्रसंगी मंत्री शेलार म्हणाले की, पहिले तर आदित्य ठाकरे यांना जनतेने सडेतोड प्रश्न विचारला पाहिजे की पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांना त्रास झाला आहे. तर नालेसफाई होत असताना, रस्त्यांची कामे होत असताना आदित्य ठाकरे तुम्ही होतात कुठे? मिस्टर इंडियासारखे गायब झाला होतात. आणि मग ते पाहणी कुठे करत होते? आज मुंबईकरांच्या वाताहातीला कोण जबाबदार याचं थेट उत्तर आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे. मागील 25 वर्षात कट कमिशनचा धंदा, कंत्राटदारांशी कट कमिशन यामुळे मुंबईची अशी अवस्था झाली आहे. आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद म्हणजे चोर मचाये शोर. याच्यापेक्षा दुसरं काही नाही, असे शेलार यांनी नमूद केले.
पुढे ते म्हणाले की, आदित्य ठाकरेंना आमचा सवाल आहे. त्यांनी त्यांची उत्तरं द्यावी. २६ जुलै २००५ रोली जो महाप्रलय मुंबईने बघितला त्यावेळेला उद्धव ठाकरे रस्त्यावर का नाही दिसले? कुठल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होते? आज आदित्य ठाकरे फिरत आहेत, तर त्यांना याची उत्तर द्यावी लागतील.
कमिशनरांची देखील सर्वस्वी चूक आहे. ज्या पद्धतीने आयुक्त खालच्या अधिकाऱ्यांवर सर्व सोपवून विदेशात जात असतील तर आयुक्तांना ही सवाल आहे, तुम्ही काय थेम्स व सीन नदीवर गेला होतात काय? आदित्य आणि उद्धव ठाकरे बरोबर. तुमच्या या ढिसाळ कारभारामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत का?
जागरूक प्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व ठिकाणी पोहोचलो. आजही पाठपुरावा करतो आहोत. प्रशासन चुकत असेल तिथे आम्ही जाब विचारायला कचरत नाही. मात्र आदित्यजींनी तर तोंडच उघडू नये. त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर थेम्स नदीमध्ये पाणी का वाढलं त्याचे विचारा!, असेही शेलार यांनी नमूद केले.
मेट्रो ३ च्या स्थानकामध्ये पाणी शिरल्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना शेलार यांनी स्पष्ट केले की, मुंबईकरांसाठी मेट्रो सेवा सुरु झाली त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या पोटात दुखतंय का? आदित्य ठाकरे यांच्या बोलण्यातला रोख आणि उपरोधिकपणा लोकांच्या समस्या दूर करण्यापेक्षा त्याच्यातला असुरी आनंद घेण्याचा जास्त दिसतो. आदित्य ठाकरेंनी यांनी कधी सकारात्मक सूचना केलेल्या आम्ही बघितल्याच नाही. जी माहिती समोर आली आहे , त्यामध्ये MMRCA यांनी सांगितलं की, जी उपयोगिता सेवा (युटीलिटी सर्विस) बांधकाम चालू होतं, तो बांधकामाचा भाग तुटून पाणी आत शिरलं. याची सर्वंकष चौकशी झाली पाहिजे, अशी मी मागणी करतो, असे शेलार म्हणाले.
मागील २५ वर्षांच्या बेजबाबदार नियोजनांमुळे खरेतर ही संपूर्ण स्थिती ओढवली आहे, कुठल्या आधारावर २५ मिमी चाच पाऊस पडला? हे उद्धव ठाकरे तुम्ही मनाने ठरवलंय, ते आधी सांगा. ताशी २५ मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला नाही, हे वरुण देवाने.. आता आदित्य ठाकरे आणि त्यांचे बगलबच्चे जे कोल्हेकुई करतायेत याचं कारण EOW तसेच ACB आणि वेगवेगळ्या व्यवस्था दोषी कंत्राटदारांना पकडायला निघाले आहेत, म्हणून कंत्राटदारांच्या विरोधात बोलायचं नाही, हा ठाकरेंचा प्रयत्न आहे.
मुंबई महापालिकेचा कारभार भाजपा आणि महायुतीच्या हातात जनतेने दिला की आम्ही या सगळ्यांवर सर्व उपाय काढू. महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांची प्रामाणिक सेवा करून दाखवू. आता कामाला लागलोच. मुंबईची तुंबई होवू नये यासाठी, जपानी तंत्रज्ञान उपयोगात आणण्यासाठी मुख्यमंत्री हे जपान दौऱयावर असताना तेथे करार करण्यात आला आणि त्याची कार्यवाही देखील आता सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री शेलार यांनी दिली.
