…पण चीनने भारताला पाठिंबा दिला नाही!
. ..पण चीनने भारताला पाठिंबा दिला नाही!
पुणे, दि.१२ मे २५ ;
भारतीय हवाई दलाने मध्यरात्री अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार म्हणाले की, गेल्या आठवड्यामध्ये काश्मीरमध्ये काही घडलं त्यामुळे साहजिकच संबंध देशात आणि लोकांमध्ये अस्वस्थता होती. पलीकडने लोक येतात आणि ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांना गोळ्या घालतात. यामध्ये कोणत्याही सरकारला लगेच भूमिका घेणं शक्य नाही. हे करत असताना काळजीपूर्वक निकाल घ्यायची गरज होती. भारत आणि पाकिस्तानचा नकाशा निर्देश करून ठेवा. त्याच्यामध्ये POK काश्मीरचा भाग पाकिस्तानने घेतला तिथेच हे हल्ला करण्याचे स्थान केंद्रित केल्याचं दिसत आहे. पीओके मध्ये दहशतवादी यांचे कॅम्प आहेत, तिथे दारू गोळा ठेवला जातो आणि सगळी मदत पाकिस्तान करते. हिंदुस्थान आणि पाकिस्तान बॉर्डर ओलांडून आपण जाऊ इच्छित नव्हतो आणि त्याची काळजी भारतीय हवाई दलाने घेतली. पीओकेमध्ये हल्ले झाले यात एक बदल दिसतो की जे काश्मीर मध्ये झाले.
घटना घडल्यानंतर संपूर्ण काश्मीर मध्ये स्थानिक जनता सोबत उभी राहिली. काश्मीरमधील विधानसभेत एकमताने निषेधाचा ठराव झाला, त्यामुळे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्वच्छ भूमिका दहशतवाद विरोधात घेतली. २६ ते २७ लोकं मृत्यूमुखी पडले होते त्याचा हिशोब करायचा होता. मात्र हे करत असताना जगामध्ये भारत आक्रमक आहे असं चित्र होऊ नये अशी खबरदारी घेतली हे योग्य असल्याचं शरद पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार म्हणाले की, सुदैवाने या हल्ल्यानंतर अमेरिका ,जपान आणि काही महत्त्वाचे देश यांनी भारताला संरक्षण दिले. पण काळजी करण्यासारखी गोष्ट अशी आहे की चीनने ते दिलेलं नाही. ठिक आहे. शेवटी आपल्याला आपल्या देशाचे महत्त्व, अधिकार आणि सार्वभौमत्त्व जतन करावं लागेल. यासाठी कष्ट देशवासीय म्हणून करावे लागतील ती मानसिकता सर्वांची दिसते ही जमेची बाजू आहे. हा जो सगळा भाग आहे त्या सतर्क राहण्याची गरज आहे. पाकिस्तानला त्यांची आणि भारताची ताकद माहिती आहे. त्यामुळे यावेळी आपल्याला सावध रहावं लागेल. आपल्या फोर्सेस आणि पंतप्रधानांनी जे काही निर्णय घेतले ते योग्यच घेतले. काही निष्पाप भगिनींचे कुंकू पुसले गेले होते त्यामुळे जर हे नाव दिले असेल तर योग्य असल्याचं शरद पवार म्हणाले.
