मुंबईतील नालेसफाई कासवगतीने!
मुंबईतील नालेसफाई कासवगतीने!
मुंबई, दि. ९ मे २५:
क्षेपणभूमीवर टाकण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या गाळाचे “एआय” ने केलेल्या विश्लेषणात तब्बल 40% फेरफार झाल्याचे उघड झाले असून ही धक्कादायक माहिती उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी घेतलेल्या आढाव्यात उघड झाली. याबाबत तातडीने पालिका आयुक्तांनी डेटा ऍनालिसीस करावे आणि कंत्राटदाराकडून १०० टक्के अपेक्षित काम करुन घ्यावे, आयुक्तांनी रस्त्यावर उतरून पहाणी करावी, असे निर्देश दिले.
उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी कालपासून मुंबई उपनगरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी घाटकोपर बस डेपो शेजारी असणाऱ्या लक्ष्मी नगर नाल्यापासून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ए.पी. आय नाला, उषा नगर नाला, माहुल नाला, माहुल खाडी परिसर आणि खारु खाडी येथील कामाची पाहणी केली. मुंबईतील नालेसफाईमध्ये निघणाऱ्या गाळाचे मापन हे तंत्रज्ञानाच्या मदतीने व्हावे अशी मागणी गेली अनेकवर्षे आशिष शेलार करीत होते, आजही त्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली. तर यावर्षी महानगरपालिकेच्या माध्यमातून AI च्या वापराने गाळ मोजणी आणि इतर कामांच्या मॅपींगला सुरुवात झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कशा पद्धतीने हे मँपिंग केले जाते याची विचारणा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी काही व्हिडीओ दाखवले. या बाबतीत अधिक माहिती घेतल्यानंतर असे निदर्शनास आले की, प्रत्येक ट्रिपमधून नालेसफाईचा जो गाळ जातो, तो गाळ ज्या ठिकाणी पडतो, याचे व्हिडिओ येतात त्याला AI च्या माध्यमातून स्कॅन केले जाते. त्यात ४० हजाराच्या वर फेऱ्या झाल्या असून त्यातील १७ हजार गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये फेरफार सापडला. हा फेरफार जास्ती गाळाचा पण असू शकतो, फेरफार कमी गाळाचा पण असू शकतो, फेरफार गाळ सोडून डेब्रीजचा, मातीचा पण असू शकतो. तर गाळ अजूनही नाल्यातच आहे.त्यामुळे फेरफार आणि गाळाची बीलं याचे देखील डेटा ऍनालिसीस करा आणि कंत्राटदाराकडून १०० टक्के अपेक्षित काम करुन घ्या, याबाबत महानगरपालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करणार, असे आशिष शेलार यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यात भांडूप येथील एपीआय नाला व उषा नगर नाल्याची पाहणी केली. उषानगर नाला हा रेल्वेच्या पुलाखालून जातो. २०२० पासून पुलाचे बांधकाम आणि नाल्याचे खोलीकरण करणे अपेक्षित होते, परंतु आत्ता ते ब्रिज तोडायला घेतला आहे. फक्त १५ दिवस बाकी असताना हा ब्रिज तोडणार कधी आणि नाला बांधणार कधी हा प्रश्न उपस्थित होत आहे. या नाल्याचे काम योग्य पद्धतीने झाले नाही तर कांजूरमार्ग व भांडूपच्या दरम्याने रेल्वे ट्रॅकवर पाणी साठते. या नाल्यातील गाळ वेळीच काढला गेला पाहिजे तरच पावसात मुंबईकरांचा रेल्वेप्रवास सुरळीत होईल यासाठी महानगरपालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करणार, असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.
माहुल नाल्यातील कामही 10 ते 15 टक्के पेक्षा झालेले नाही. तसेच खारु क्रिक येथे अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. नाल्यात प्रचंड गाळ आणि प्लॅस्टिकचे ढिगारे पहायला मिळाले. तसेच या नाल्याच्या भिंती ही बांधण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे हे काम तातडीने सुरु करा असे निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी दिले.
