महाराष्ट्राचा हेल्थ मॅप तयार होण्यास मदत!
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम.
मुंबई दिनांक 26 सप्टेंबर :
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, मोहिमेमुळे महाराष्ट्राचा हेल्थ मॅप तयार करण्यास मदत होणार असून त्याद्वारे सुदृढ आणि निरोगी महाराष्ट्र निर्माण करणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
माझे कुटुंब- माझी जबाबदारी या मोहिमेची राज्यभर अंमलबजावणी सुरु झाली असून स्वयंसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्यविषयक माहितीचे संकलन करत आहेत. लोकांच्या आरोग्याची माहिती घेत आहेत, यामध्ये कोरोना बाधित, बरे झालेले रुग्ण, त्यांची पोस्ट कोविड स्थिती याबाबत माहिती घेत आहेत. लोकांना असलेल्या इतर आजारांची, त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीची माहिती घेत आहेत.मुख्यमंत्री ठाकरे यांनी VC प्रणालीद्वारे कोकण आणि पुणे विभागाचा कोरोनाविषयक आढावा घेतला.
अनलॉक प्रक्रियेमध्ये आता दळवणवळण आणि नियमित व्यवहार सुरु झाले असल्याने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे हे लक्षात घेऊन मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ ठेवणे या त्रिसुत्रीचे काटेकोर पालन करायला हवे, त्यादृष्टीने लोकांची जीवनशैली बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. मोहिमेत राज्यातील जनतेला मोठ्याप्रमाणात सहभागी करून घेऊन मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
कोकण :10 लाख 63 हजार 163 कुटुंबांची पाहणी
कोकण विभागात 1 कोटी 92 लाख 72 हजार 065 लोकसंख्या असून, 48 लाख 66 हजार 372 कुटुंब संख्या आहे. यासाठी 7 हजार 425 पथकांची आवश्यता आहे. त्यापैकी 6 हजार 721 पथके नेमण्यात आलेलीआहेत. दररोज 2 लाख 17 हजार 594 कुटुंबांना भेटी दिल्या आहेत.आजअखेर ही संख्या 10 लाख 64 हजार 143 एवढी होते. भेटीदरम्यान 1 हजार 403 तापाचे रुग्ण आढळले तर 38 हजार 658 कोरोना सदृष्य आढळून आले आहेत. कोकण विभागात 6 हजार 780 ऑक्सिमिटर आवश्यक आहे. त्यापैकी 6 हजार 420 ऑक्सिमिटर उपलब्ध आहेत. 6 हजार 666 थर्मल स्कॅनरची आवश्यकता आहे. त्यापैकी 6 हजार 602 थर्मल स्कॅनर उपलब्ध आहेत.
कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोरोनाला दूर ठेवून सुरक्षित राहण्यासाठी या योजनेचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.
ठाकरे यावेळी म्हणाले, वैद्यकीय अधिकाऱ्यांना ट्रीटमेंट करताना काही अडचण असल्यास टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी.ग्रामपंचायत पातळीवर अधिक लोक सहभागी होतील याकडे लक्ष द्यावे. प्रचार प्रसिद्धीसाठी विशेष प्रयत्न करावेत.
कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये सरासरी 25 टक्के आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री यांनी समाधान व्यक्त केले. स्थानिक पालिकेच्या माध्यमातून घरोघरी तपासणी, सर्वेक्षण आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी संपूर्ण राज्यात 55 हजार 268 आरोग्यपथके तैनात करण्यात आली असून, कालअखेर 70.75 लाख कुटुंबांची तपासणी करण्यात आली आहे. यात 2.83 कोटी व्यक्तींची तपासणी झाली आहे. 37 हजार 733 संशयितांपैकी 4 हजार 517 कोविड रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली.
मोहिमेच्या यशासाठी जनतेचा सहभाग आवश्यक…
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपल्याला एका निश्चित मार्गाने जावे लागणार आहे. कोणतीही मोहीम यशस्वी होण्यासाठी त्यामध्ये जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणात असायला हवा. कोरोनावरील लस उपलब्ध होईल तेव्हा होईल, तथापि, आज आपण उपचार पध्दती, जनजागृती याद्वारे या संकटाचा प्रभावीपणे सामना करु शकतो. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि विशिष्ट अंतर पाळणे यावरही आपण सर्वांनी भर दिला पाहिजे. समाजामध्ये दोन प्रकारचे लोकं दिसत आहेत. मनात प्रचंड भीती असलेले आणि दुसरे बेपर्वाईने वागणारे की जे मास्क वापरत नाहीत, सोशल-फिजिकल डीस्टंस पाळत नाहीत. कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या परंतु लक्षणे नसलेल्या व्यक्तींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असतो. त्यांच्या माध्यमातून होणारा संसर्ग कोणासाठी तरी घातक ठरु शकतो, असेही ते म्हणाले.
