सांगली जिल्ह्यात रिकव्हरी रेट वाढतोय..
मुंबई दि. २५ सप्टेंबर :
सांगली जिल्ह्यात रिकव्हरी रेट वाढत आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जात असून या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात लोकांच्या अँटीजन टेस्ट, आरटी पीसीआर टेस्ट केल्या जात आहे. जिल्ह्यात आवश्यक बेड्स उपलब्ध आहेत. आणखी बेड्स वाढवले जाणार आहेत अशी माहिती सांगली जिल्हयाचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे पुणे विभागातील कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री जयंत पाटील उपस्थित राहिले आणि त्यांनी आपले मत व सुचना मांडल्या. या बैठकीत सांगली जिल्ह्यासाठी वाढीव निधीची मागणीही जयंत पाटील यांनी केली. लोकांमधील अस्वस्थता आता कमी झाली आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे त्याकडे शासनाचे लक्ष वेधले. तसेच ज्याप्रमाणे सांगली जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा मोफत केला जात आहे. निमशासकीय रुग्णालयातही कमी दरात औषध उपलब्ध केले जात आहे त्याप्रमाणे इतर जिल्ह्यातही रेमडेसिवीर इंजेक्शनची व अन्य औषध उपलब्ध करून देण्याच्या सुचना जयंत पाटील यांनी केल्या.
भविष्यात रुग्णांमध्ये वाढ होणार असेल तर त्यासाठी शासनाने आधीच यंत्रणा सज्ज करायला हवी तसेच रुग्णालयांमध्ये वाढ करायला हवी अशी सुचनाही जयंत पाटील यांनी केली.
जिल्ह्यातील डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. राहुल पंडित यांच्या मार्गदर्शन कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे ठेवला गेला होता. राज्यभरातील डॉक्टरांचे मार्गदर्शन करण्यासाठी असे कार्यक्रम राज्यभर राबवायला हवेत असेही मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
