कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द.
कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द.
मुंबई, दि. २३ मार्च –
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, कांदा निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क १ एप्रिल २०२५ पासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
या निर्णयाचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, “केंद्रसरकारचा हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कांदा निर्यातीवर आकारण्यात येणारा २० टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा प्रश्न सुटावा यासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्यासोबत थेट संवाद साधून त्यांना याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती. राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यावरील तातडीने उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी पुढाकार घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मी त्यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार मानले. राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून, भविष्यातही शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील.” असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले आहे.
