मुंबईतील पायाभूत प्रकल्पांसाठी रुपये १ लाख कोटी द्या.
मुंबईतील पायाभूत प्रकल्पांसाठी रुपये १ लाख कोटी द्या.
दिल्ली, दि. ४ फेब्रुवारी २०२५ :
देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबई, महाराष्ट्रा बरोबरच देशाच्या विकासात भर घालणारे मुंबईतील अनेक पायाभूत प्रकल्प निधी अभावी रखडले असुन ते पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने १ लाख कोटी रुपये महाराष्ट्राला द्यावेत, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत केली.
मुंबई हि देशाची आर्थिक व औद्योगिक केंद्र आहे. महाराष्ट्राबरोबरच देशाच्या विविध काना कोपऱ्यातून जनता येथे येत असते. यामुळे लोकसंख्येत दिवसेन दिवस वाढ होत असून वाहतूक व्यवस्था, आरोग्य तसेच शहरांच्या विकासात भर घालणाऱ्या विविध पायभूत सुविधांवर याचा अधिक ताण पडत आहे. त्यामुळे शहरी विकासात भर घालणाऱ्या विविध योजना पूर्ण करण्यासाठी भरघोस निधीची गरज आहे. यात रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे करणे, आरोग्य सेवांचे सक्षमीकरण, गारगाई-पिंजाळ व दमणगंगा सारख्या पाण्याच्या योजना, मेट्रो रेल्वेचे विस्तारीकरण, मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी, कॅन्सर केयर हॉस्पिटल, वेस्ट टू एनर्जी प्लांट सारखे आदी प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येईल. गारगाई-पिंजाळ प्रकल्प पूर्ण केल्यास मुंबईतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास बऱ्याच अंशी मदत होणार आहे. त्याचा बरोबर मेट्रो व मल्टी मोडेल कनेक्टिव्हिटीमुळे वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटू शकतो.
कॅन्सरवरील उपचारासाठी विशेष हॉस्पिटलची सुविधा उभारणे शक्य आहे, वेस्ट टू एनर्जी प्लांटचा उभारणीमुळे दिवसेंदिवस वाढत्या कचऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे त्याच बरोबर वीज निर्मितीत हि वाढ करणे शक्य होणार आहे, असेही खासदार वायकर यांनी पटलावर ठेवण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईतील प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणे आवश्यक असून त्यामुळे मुंबई अधिक सक्षम केल्यास संपूर्ण भारत देशाच्या प्रगतीला हातभार लावण्यास निश्चित मदत होणार आहे. राष्ट्र हिताच्या दृष्ट्रीने मुंबईच्या समस्या सोडवण्यास प्राथमिकता देणे आवश्यक असल्याचे ही वायकर यांनी नियम ३७७ अन्वये मांडलेल्या मागणीचे निवेदन लोकसभेच्या पटलावर ठेवण्यात आले.
