images (93)

सोयाबीन खरेदीला सात दिवस मुदतवाढ !

मुबई दि. २८ जानेवारी :-

राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून ३१ जानेवारी नंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू राहावी, अशी मागणी होत आहे. त्या मागणीच्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी सात दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

लातूर जिल्ह्याचे खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाले असून शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांची वाढीव उद्दिष्ट देण्याची मागणी लक्षात घेता लातूर जिल्ह्यासाठी आता 20 हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदीच्या वाढीव उद्दिष्टालाही मंजुरी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यासाठी यापूर्वी दहा हजार मेट्रिक टनाचे वाढीव उद्दिष्ट मंजूर करण्यात आले होते.

राज्यात 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत देण्यात आली आहे. राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून 562 खरेदी केंद्रावर 25 जानेवारी पर्यंत 7 लाख 81 हजार 447 मेट्रिक टन पेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी झालेली आहे. 31 जानेवारी पर्यंत या आकड्यात मोठी वाढ होणार आहे. अनेक जिल्ह्यांनी आपले उद्दिष्टे पूर्ण केले आहे. लातूर जिल्ह्याने आपले पीपीएस खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण केले असून 1 लाख 28 हजार 417 मेट्रिक टन खरेदी पूर्ण झालेली आहे. काही शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करणे बाकी असल्याने तेथील लोकप्रतिनिधी व शेतकरी यांच्या मागणी नुसार आता लातूर जिल्ह्यासाठी वाढीव 20 हजार मेट्रिक टनासह एकूण 30 हजार मेट्रिक टनाचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन 12 जानेवारी पर्यंत होणाऱ्या सोयाबीन खरेदीला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांना विनंती करून 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ मिळविली होती. आता पुन्हा राज्यातील शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता राज्यात 31 तारखेनंतर सात दिवस सोयाबीन खरेदीची मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *