‘पोलिओ’प्रमाणे ‘फॅटी लिव्हर’ हटवण्यासाठी संकल्प करा.
‘पोलिओ’प्रमाणे ‘फॅटी लिव्हर’ हटवण्यासाठी संकल्प करा.
मुंबई, दि. २१ जानेवारी;
पोलिओ सारख्या आजाराला राष्ट्रीय पातळीवर हटवण्याच्या मोहिमेत आपण सर्व समाजाने एकत्र येऊन यश मिळविले. नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजारालाही हटवण्यासाठी संकल्प करूयात. या मोहिमेसाठी वैद्यकीय क्षेत्रासोबत सदिच्छादूत म्हणून कार्यरत राहणार असल्याची ग्वाही बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित ‘सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रूग्णालय केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) आजाराबाबतच्या माहिती पुस्तिकेचे अनावरणही करण्यात आले. तसेच केईएम रूग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षांनिमित्त विशेष पुस्तिकेचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले.
एखाद्या संस्थेच्या इतिहासात १०० वर्षांचा कालावधी हा अतिशय मोठा कालावधी असतो. वेगाने बदलणार्या जगतामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील सेवा-सुविधाही अतिशय वेगाने बदलत आहेत. जनसेवेचे व्रत घेतलेल्या केईएम संस्थेच्या यशामध्ये आणखी १०० वर्षांची भर पडावी, अशा शुभेच्छा बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी याप्रसंगी दिल्या.
कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच योग्य वैद्यकीय सल्ला हा कोणत्याही आजारावर उपचारासाठी महत्वाचा ठरतो. अद्दयावत तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रात अतिशय वेगाने वापर होतो आहे. त्यामुळे गेल्या अनेक दशकातील वैद्यकीय शल्यचिकित्सा क्षेत्रात झालेल्या बदलांबाबतही त्यांनी याप्रसंगी भाष्य केले. गेल्या अनेक वर्षात सातत्याने वैद्यकीय क्षेत्राने आपल्याला कशा पद्धतीने जीवनदान दिले याबाबतच्या आठवणीही त्यांनी याप्रसंगी जागृत केल्या. कूली चित्रपटाच्या निमित्ताने अपघातात मिळालेले उपचार, टीबी आजाराच्या निमित्ताने मिळालेले उपचार, यकृताचा आजार याप्रसंगी योग्य उपचार मिळाल्याने आयुष्यमान वाढल्याचे श्रेय त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाला दिले. आगामी काळातही जनसेवेचा वारसा केईएम रूग्णालयात शिक्षण घेणाऱ्या नव्या उमेदीच्या डॉक्टरांनी कायम ठेवावा, अशी अपेक्षाही बच्चन यांनी व्यक्त केली.
कोव्हिडच्या कालावधीत डॉक्टरांनी रूग्णसेवेसाठी केलेल्या कार्याचे कौतुकही अमिताभ बच्चन यांनी याप्रसंगी केले. अनेकदा डॉक्टरांच्या आश्वासक हमी मुळेच रूग्णांचा ५० टक्के आजार बरा होतो. त्यामुळे मानवतेसाठी सुरू असणारे अविरत कार्य हे समाजातील शेवटच्या घटकाचा लाभ होईल या उद्देशाने केईएम रूग्णालयाच्या माध्यमातून अखंडितपणे व्हावे, अशी. सदिच्छाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
