आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविजय मिळवू!
आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविजय मिळवू!
शिर्डी, दि. १३ जानेवारी ;
राष्ट्रीय विचारसरणीच्या संघटनांनी एकत्र येऊन अराजकतावादी शक्तींना विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत केले. महायुतीतील सर्व पक्षांना सोबत घेऊन पुढची वाटचाल करायची आहे. विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्येदेखील महाविजय मिळवणार असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
शिर्डी येथे ‘भाजपा महाविजयी प्रदेश अधिवेशनात फडणवीस बोलत होते. या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, पियुष गोयल, राष्ट्रीय सह संघटन सरचिटणीस शिवप्रकाश, राष्ट्रीय विनोद तावडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष व मंत्री ॲड. आशिष शेलार व इतर मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, निवडणुकीत पराभव झाला तरी महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न अराजकतावादी शक्ती करत आहेत. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं तो सैफ हैं’ हा दिलेला मंत्र अंगिकारत सर्व समाजांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. शासनाचा कारभार प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने चालला पाहिजे या दृष्टीने प्रत्येक विभागाला 100 दिवसांचा कार्यक्रम दिला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसह आपण सुरु केलेल्या सर्व योजना सुरुच राहणार आहेत.
‘राष्ट्र प्रथम’ म्हणजे ‘श्रद्धा’ आणि ‘अंत में मै’ म्हणजे ‘सबुरी’! ज्यांना हा मंत्र समजला ते सर्व यशस्वी झाले आणि ज्यांना हा मंत्र समजला नाही त्यांची अवस्था वाईट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मिळालेला हा ऐतिहासिक विजय भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना समर्पित केल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
