सरकार अजुनही ॲक्शन मोडवर नाही.
सरकार अजुनही ॲक्शन मोडवर नाही.
पुणे, दि. ३ जानेवारी २०२५;
राज्यातील मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्रात क्रांती घडवली, त्याची नोंद नव्या पिढी पुढे गेली पाहिजे. तसे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत. याकरीता काँग्रेसने अनेक उपक्रम त्यांच्या काळात राज्यात राबवले असून अजुनही हे उपक्रम राबवले जात आहेत. आजचा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात क्रांतिकारीक दिवस, सामाजिक परिवर्तनाचा दिवस आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अन्यायाला न जुमानता सुरू केलेल्या शिक्षणामुळे माझ्यासारख्या असंख्य मुली शिकल्या नसत्या. आम्ही जे आता तुमच्यासमोर उभे आहोत, ते राहिलो नसतो. या सगळ्यामागे शाहु, फुले आणि आंबेडकरांचे खूप मोठं योगदान आहे अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन केले आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात सावित्रीबाई फुले यांना वंदन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला आहे.
सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, विधानसभेचा निकाल लागून दीड महिना झाला आहे. या सरकारला एवढं मोठं बहुमत मिळालं पण हे सरकार अजुनही अॅक्शन मोडवर नाही. महाराष्ट्राला या सरकारकडून अनेक अपेक्षा होती. या बहुमत मिळालेल्या सरकारची काल पहिली राज्यमंत्रिमंडळ बैठक झाली. पण या बैठकीवेळी बातम्या आल्या की, अनेकांनी पदभार स्वीकारला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्वांना टार्गेट दिले असून सर्वांनी चार्ज घेऊन कामाला सुरूवात केली पाहिजे. पण मुख्यमंत्री एकटेच अॅक्शन मोडवर दिसतात पण बाकी मंत्री कोणच अॅक्शन मोडवर नाहीत, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी एक लोकप्रतिनिधी आहे. मला खासगी भावना व्यक्त करण्याचा अधिकार नाही, कारण मी लोकसेवेत आहे. माझं कुटुंब वेगळं आहे. माझ्या कुटुंबाबाबत माझ्या मनात कधीच अंतर नव्हतं. लोकसभेच्या मतदानानंतरही मी पहिल्यांदा आशाकाकींच्या पाया पडायला गेले. त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मी कधीच गल्लत करत नाही. तसंच, आशाताई पवारांना भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत माहिती विचारली आहे. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेबाबत दररोज एक केस, खून, यांसारख्या बातम्या वाढल्या आहेत. अनेकदा यामागचा वेगळा ऐंगल असतो हा ऐंगल म्हणजे इकोनॉमी. पण या इकोनॉमीची दुर्देवाने समाजात जास्त चर्चा होत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवगंत नेते आर. आर. पाटील हे प्रथम नेते होते ते उपमुख्यमंत्री असताना गडचिरोली जिल्हा दत्तक घेऊन काम करत होते. त्याचनुसार देवेंद्र फडणवीस गडचिरोली काम करत आहे ही चांगली गोष्ट आहे. नक्षलवाद, दहशतवाद विरोधात सर्व पक्ष एकत्रित आहे असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
