मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, you are Great!
मुंबई दि. २१ सप्टेंबर :
एखाद्या प्रकल्पाच्या उद्घाटनावरून दोन पक्षात वाद झालेले आपण अनेकदा पाहिले आहे. तर उड्डाणपूल, शासकीय कार्यालय, रुग्णालय किंवा नदीवरील पूल यांचे बांधकाम पूर्ण होऊनही केवळ उद्घाटन वरून ते अनेक दिवस पडून राहतात पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करा असे निर्देश देऊन वाहनधारकांची मोठी गैरसोय तर टाळावी पण लोकांची मनंही जिंकली.
त्याचे झाले असे की, मुंबई-नाशिक महामार्गावर माणकोली येथील उड्डाण पुलाच्या ठाणे दिशेने डाव्या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच इतर लोकप्रतिनिधी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत दुपारी दीड वाजता हे लोकार्पण ठरले होते. त्याप्रमाणे एमएमआरडीएने आवश्यक ती तयारीही केली होती. मात्र पहाटे भिवंडी येथे इमारत दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी भिवंडी येथे धाव घेतली व मदत कार्य वेगाने सुरू झाले, त्यानंतर हा लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्यात आला.
केवळ अधिकृत उदघाटन झाले नाही म्हणून उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवणे आणि वाहनधारकांची गैरसोय करणे बरोबर नाही असे सांगून मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला उद्घाटननाची वाट न पाहता पुलाची मार्गिका खुली करून वाहतूक सुरू करण्यास सांगितले आणि लोकांना मोठा दिलासा दिला.
