शेतक-यांनो, तुमचा खरा मित्र कोण हे ओळखा!
मुंबई, दि. 20 सप्टेंबर 2020:
शेतकरी बांधवानो तुमचा खरा मित्र कोण ? आणि आपले राजकीय अड्डे उध्वस्त होतील म्हणून लबाडीचे राजकारण कोण करतेय ? हे ओळखा..कृपया तुम्ही हे निट समजून घ्या. तुम्ही जगाचे अन्नदाते आहात, तुम्ही फसगत करुन घेऊ नका, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.
संसदेत कृषी विधेयक मंजूर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यानंतर 2017 ला कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्याची आम्ही कायद्यात सुधारणा केलेली, त्याला ज्यांनी त्यावेळी विरोध केला आणि सरकार बदलताच त्याच आघाडी सरकारने ही सुधारणा रद्द केली. बघा शेतकरी विरोधी नेमके कोण ?
तसेच शेतकऱ्यांना पडणारा आडत चा भुर्दंड रद्द करण्याचा तत्कालीन भाजपाच्या राज्य सरकारने निर्णय घेतला त्याला काँग्रेस, राष्ट्रवादीने विरोध केला होता. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक कायदा केला. त्यालाही विरोध करीत आहेत, नेमके शेतकरी विरोधी कोण?
आज मंजूर झालेल्या कायद्याने शेतकऱ्यांना कोणत्याही स्थानावरून कोणत्याही ठिकाणी आपल्याला हव्या त्या किंमतीला शेतीमाल विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. न्यूनतम समर्थन मूल्य (MSP) हे यापुढेही दिले जाणार आहे. मग, हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असतानाही नव्या कायद्याला विरोध का ? असा सवाल त्यांनी केला आहे.
