पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांची आता खैर नाही
पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांची आता खैर नाही.
नागपूर, दि. 2 जून २०२०
शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेवर उपलब्ध करण्याच्या सूचना दिलेल्या असून शेतकऱ्यांवर कुठलेही कर्ज असले तरिही बँक त्यांना पीक कर्ज नाकारू शकत नाही. कोणत्याही बँकेने शेतकऱ्याला कर्ज देण्यास टाळाटाळ केली तर त्या बँकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातून कृषीमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे नागपूर विभागाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी विभागाने नियोजन केले असून खत व बियाण्यांची कमतरता भासणार नाही. मात्र खते व बियाणे चढ्या भावाने विकणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देऊन कृषीमंत्री म्हणाले शासनाने हे वर्षे उत्पादकता वर्षे म्हणून घोषित केले असून दर्जेदार खते व बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे. उत्पादकता वर्षाच्या निमित्ताने जिल्हा, राज्य व देशातील पिकांच्या उत्पादकतेचा तुलनात्मक अभ्यास करून कृषी उत्पादकता वाढविण्याचे नियोजन व उपाययोजना आखण्यात येणार आहे. सोयाबीन बियाणं अपेक्षापेक्षा कमी असणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी घरघुती बियाण्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. या बियाण्याच्या उगवण क्षमतेच्या प्रयोगाबाबत कृषी विभागाने गावपातळीवर मार्गदर्शन करावे, असेही ते म्हणाले.
बांधावर खते व बियाणे योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची असून या योजनेला गती देण्याच्या सूचना भुसे यांनी केल्या. राज्यात 50 हजार टन बियाणे व 1 लाख मेट्रिक टन रासायनिक खत शेतकऱ्यांच्या बांधावर वाटप करण्यात आले आहे. युरियामुळे जमिनीचा पोत खराब होत असल्याचे निदर्शनास आले असून युरिया खताचा जपून वापर करण्याबाबत जागृती करावी, असे ते म्हणाले.
