मविआची सत्ता आल्यास मोफत शिक्षण, हमीभाव आणि….

0
FB_IMG_1730874701185

मविआची सत्ता आल्यास मोफत शिक्षण, हमीभाव आणि….

 

कोल्हापूर दि. ६ नोव्हेंबर ;

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 5 महत्वाची आश्वासने दिली असून मोफत शिक्षण, मुंबईतपरवडणा-या दरात घरे, शेतमालाला हमीभाव महिला पोलीस स्टेशन अशी आश्वासने दिली आहेत.

कोल्हापूरच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईतील अदानी प्रकल्प रद्द करुन त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्या सकट घरे देऊ. ग्रामीण भागातील जनतेने मुंबईत यावे. मुंबई तुमची आहे, मराठी माणसाची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांना सांगितले. मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. त्यामुळे मुंबईवर तुमचा हक्क आहे. आगामी काळात मविआची सत्ता आल्यास आम्ही धारावी आणि मुंबई परिसरात महाराष्ट्रातील भूमिपूत्रांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करुन घेऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

राज्यातील विद्यार्थिनींना सरकारकडून मोफत शिक्षण दिले जाते. परंतु, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल. मुलगा आणि मुलगी दोघेही कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. त्यामुळे मुलांनाही मोफत शिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

पोलीस ठाण्यात गेल्यावर महिलांना कुठे तक्रार करायची, हे अनेकदा लक्षात येत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात मविआची सत्ता आल्यास महिला पोलिसांची भरती केली जाईल. पोलीस ते वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी असलेले पोलीस ठाणे सुरु करण्यात येईल.

राज्यातील शेतकऱ्यांना मविआची सत्ता आल्यास हमीभाव दिला जाईल. आमचं सरकार पडलं नसतं तर यंदाच्या वर्षी शेतकरी कर्जमुक्त झाला असता. पण आमची सत्ता पुन्हा आल्यावर शेतीमालाला हमीभाव देऊ, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

आमचे सरकार असताना पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर होते. आता पुन्हा आमची सत्ता आली की महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात कोणतेही बदल होणार नाही. डाळ, तांदूळ, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव आमचे सरकार स्थिर ठेवेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *