इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी.
पुणे, दि ८ ऑक्टोंबर ;
इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
निवडणुकीत मला स्वत:ला उभं राहायचं नाही. जनतेनं मला 14 वेळा निवडून दिलं. त्यातल्या 7 वेळा इंदापूर तालुक्यातील जनतेनं मला मतं दिली. त्यामुळं आता मला स्वत:साठी काहीच मागायच नाही. मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेचं जीवन बदलायचं आहे. हे जर करायचं असेल, तर ज्यांच्याकडे कर्तृत्व, अनुभव, प्रशासन आहे अशाही लोकांची गरज आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी अशा लोकांना विधानसभेत पाठवणं हे तुमचं काम आहे आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम आहे. असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
पवार म्हणाले की, आम्ही वेगवेगळ्या पक्षात असू पण जेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न आला तेव्हा आम्ही नेहमीच एकत्र काम केले. कृषी सुधारणांसाठी जेव्हा जेव्हा नवीन नेतृत्वाची गरज भासली तेव्हा हर्षवर्धन पाटील यांना नेहमीच पहिली पसंती असते. हा केवळ इंदापूरचा निर्णय नाही. परंतु महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि संपूर्ण देशातील कृषी क्षेत्रासाठी असे शरद पवार म्हणाले.
यावेळी सभेला संबोधित करताना, शरद पवार म्हणाले की, कृषी धोरण आणि ग्रामीण विकासासाठी सतत समर्पण केल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांचे कौतुक केले आणि हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे वडील, बारामतीचे माजी खासदार शंकरराव पाटील या दोघांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकला.
महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागं का उभी राहिली? महाराजांना माणसं आजही का विसरु शकत नाहीत. महाराष्ट्राला लढणारा नेता पाहिजे असतो. लढणाऱ्या नेत्याच्या मागं उभं राहण्याची महाराष्ट्रातील माणसांची पद्धत असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.
दिल्लीवाल्यांनी जेव्हा जेव्हा जबरदस्ती केली तेव्हा शरद पवारांनी मराठी स्वाभिमान दाखवण्याचं काम केलं. आज देखील मागच्या काही वर्षात दिल्लीश्वर हे शरद पवारांना नमवण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते. सर्व मार्गांचा अवलंब झाला. 2019 च्या निवडणुकीच्या आधी ईडीची नोटीस आली. पवारांना मोडल्यानंतर महाराष्ट्र मोडता येईल अशी भावना या लोकांची होती. महाराष्ट्र मोडण्याचं काम दिल्लीत बसून काही लोकं करत आहेत. म्हणून स्वाभिमानी माणसं शरद पवारांच्या मागं उभी राहिली, असं जयंत पाटील म्हणाले.
हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये त्यावेळच्या काही प्रश्नांमुळं गेले. पण, तुम्ही स्वगृही येत आहात, यापूर्वीच तुम्ही यायला हवं होतं पण आमच्याकडे गर्दी होती, आता येत आहात याचा आनंद होत आहे. बहुजनांच्या उद्धाराचं राजकारण करण्याची पवारांची भूमिका आहे. महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा विचार उजवा ठरला पाहिजे, ही भूमिका शरद पवार यांनी जपली आहे. कितीही हल्ले झाले तरी बहुजन समाजाच्या विकासाची पताका खांद्यावर घेऊन ते चालत आहेत, त्यामुळं शरद पवार सोबत लोक येत असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
मी या पक्षात प्रवेश करण्यापूर्वी माझी आणि जयंत पाटील यांची जेव्हा जेव्हा भेट व्हायची, आमचं भेटणं किंवा बोलणं व्हायचं. आम्ही फोनवर बोलायचो. मला काही मिळावं म्हणून पक्ष प्रवेश केला नाही. तुम्ही जी जबाबदारी द्याल ती घेऊ. मी शब्दाचा पक्का आहे. राजकारण व्यक्तिगत स्वार्थासाठी करत नाही. कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्यामुळेच आज तुतारी हातात घेतली असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.
