‘भाभीजी के पापड’ खाऊन लोक बरे झाले का?
नवी दिल्ली, दि. 17 सप्टेंबर :
कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास महाराष्ट्र सरकारला अपयश आले असे आरोप करणा-यांचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्रात अनेक लोक करोनातून बरे होत आहेत. धारावीतील परिस्थितीही नियंत्रणात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही मुंबई महापालिकेच्या कामाचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र सरकारवर टीका करणाऱ्या प्रत्येकाने या गोष्टी लक्षात घ्याव्या, असे ते म्हणाले.
कोविडवर झालेल्या चर्चेत संजय राऊत बोलत होते. संजय राऊत यांनी भाजपालाही टोला लगावला. लोक ‘भाभीजी के पापड’ खाऊन बरे होतात का ? असा सवाल त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी हे पापड लाँच करत यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते असा दावा केला होता. यानंतर काही दिवसात हे मंत्री स्वतःच कोरोना संक्रमित झाले. ही राजकीय लढाई नसून लोकांचे जीव वाचण्याची लढाई आहे’, ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढली जात आहे असे संजय राऊत म्हणाले.
केंद सरकार राज्यांना मदत करत नाही आता पीपीई किट देणे ही बंद केले आहे. राज्यांचा जीएसटी परतावाही दिला नाही. कमीत कमी पीएम केअर फंडातील हजारो कोटीमधून राज्यांना निधी द्या अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.
