जरांगे मराठा आरक्षण विषयापासून दूर गेले.
मुंबई, दि. १९ ऑगस्ट;
खुन्नस काय असतो हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले असते पण लोकशाही मार्गाने ते आंदोलन करायला देताहेत. सुडाची भावना असती तर ते तसे वागले असते. परंतु ते लोकशाही मार्गाला मानणारे आहेत. तुम्हीच आंदोलनाआडून किती खूनशी आहात हे महाराष्ट्र पाहतोय. सर्वांना अरेतुरे करता. त्यामुळे खूनशी कोण आहे हे तुमच्या प्रत्येक वाक्यावाक्यात महाराष्ट्राला दिसून येतेय, अशी टीका भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली.
पत्रकारांशी बोलताना दरेकर म्हणाले की, राजकारणात कोण येत असते, कोण जात असते. परंतु मनोज जरांगे आपण काळजी घ्या की, आपल्या आंदोलनात पहिल्या दिवसापासून असणारी लोकं आपल्या सोबत आहेत का? मला अनेक जण भेटले. येणाऱ्या काळात तुमच्यापासून किती लोकं बाहेर पडतील त्याची मोजदादही करता येणार नाही, याची काळजी घ्या. देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची काळजी घेऊ नका. महाराष्ट्रातील जनता त्यासाठी सक्षम आहे.
जरांगे मराठा आरक्षण विषयापासून दूर गेलेत. त्यांचा राजकीय पक्ष होतोय. ते पक्ष काढतील किंवा अपक्ष राहतील, कुठल्यातरी पक्षाला पाठिंबा देतील. त्यामुळे ज्यांना तिकीट मिळणार नाही, पक्षापेक्षा जे उमेदवारीला महत्व देतात असे लोकं भेटत असतात. आता त्यांना एक नवीन राजकीय दुकानं मिळालेय त्या दुकानात जातील, असा टोलाही दरेकरांनी लगावला.
