जालना-जळगाव रेल्वेला केंद्राकडून ग्रीन सिग्नल..!
मुंबई, दि. ११ ऑगस्ट ;
जालना – जळगाव नवीन लोहमार्गासाठी आता केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळानेही ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. रेल्वे बोर्डाच्या प्रस्तावावर केंद्राने शिक्कामोर्तब करून जालना लोकसभा मतदार संघातील नागरीकांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
केंद्रातील आणि राज्यातील सरकारच्या माध्यमातून जालना लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी यासह अनेक मोठे आणि महत्वाकांक्षी प्रकल्प खेचून आणण्यात दानवे यांनी कुठलीही कसर बाकी ठेवली नाही. जालना – जळगाव नवीन लोहमार्गाच्या संकल्पनेपासून ते सर्वेक्षणापर्यंतचा टप्पा यशस्वीरित्या पार केल्यानंतर या लोहमार्गासाठी राज्यसरकारकडून ५० टक्के हिस्साही मंजूर करून घेतला. त्यानंतर रेल्वे बोर्डाकडून प्रस्ताव मंजूर करवून घेतल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल मिळविण्यात दानवे यशस्वी ठरले आहेत. या नवीन लोहमार्गाचे संपूर्ण श्रेय दानवे यांनाच जात असून त्यांच्याच अथक प्रयत्नांचे, पाठपुराव्याचे हे फळ आहे. या रेल्वेमार्गामुळे जालना लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण कायापालट होवून पर्यटनक्षेत्रातही मोठी वाढ होणार आहे. अजिंठा लेणीमुळे हा मार्ग विदर्भासह मराठवाड्यातील प्रवाशांसाठी मोठा सोईस्कर ठरणार आहे. विशेष म्हणजे श्रीक्षेत्र राजूरचे गणपती मंदिर देखील याच लोहमार्गावर आल्याने मराठवाडा – खान्देशाचे संबंध अधिक दृढ होण्यास मोठी मदत होणार आहे. थेट उत्तर भारताशी जोडणाऱ्या या रेल्वे मार्गास केंद्र सरकारच्या कॅबीनेटमध्ये मंजूरी मिळाल्यानंतर आता लवकरच भूसंपादनासह पुढील प्रक्रिया सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
दानवे यांनी मंत्रीपदाच्या काळात केंद्र सरकारकडून या लोहमार्गासाठी ५० टक्के खर्चाची मंजूरी अगोदरच मिळवून घेतली होती. त्यानंतर राज्यशासनानेही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या रेल्वेमार्गासाठी राज्याचा हिस्सा म्हणून पन्नास टक्के खर्चाचा भार उचलण्यास मंजूरी दिली आहे. जालना लोकसभा क्षेत्रातून जाणारा १७४ किमी. लांबी असलेला हा रेल्वेमार्ग लवकरच मतदारसंघातील नागरीकांची स्वप्नपुर्ती करणारा ठरेल, असा आशावाद निर्माण झाला आहे.
प्रस्तावीत जालना – जळगाव रेल्वेमार्गसारख्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम मार्गी लावून दानवे यांनी ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. दीड वर्षांपूर्वी त्यांनी या लोहमार्गाची घोषणा केली होती. त्यानंतर या प्रकल्पासाठी निधीची तरतूद करून सर्वेक्षण करून पूर्ण केले. सर्वेक्षणानंतर त्याचा डीपीआर तयार करून तो रेल्वे बोर्डाला सादर केला. केंद्र व राज्य सरकारने यासाठी निधीची तरतूदही केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने या नविन जालना – जळगाव नवीन रेल्वेमार्गावर शिक्कामोर्तब केले आहे. दानवे यांच्या प्रयत्नांतून आणखी एक मोठा प्रकल्प साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील काळात आवश्यक प्रक्रीया पूर्ण करुन लवकरच हे काम सुरु होणार आहे. जालना जिल्हा स्टील, बियाणे आणि मोसंबीसाठी प्रसिध्द आहे. आता ही उत्पादने रेल्वेने गुजरात, मध्यप्रदेशच्या बाजारपेठेत थेट नेता येईल. मराठवाड्यातील उद्योग,व्यापार व पर्यटनाला या मार्गामुळे चालना मिळणार असल्याने या भागाच्या विकासात हा रेल्वे मार्ग मैलाचा दगड सिध्द होणार आहे.
