मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अनिल देशमुखांची चौकशी करा..
मुंबई, दि. ६ ऑगस्ट;
मनसुख हिरेन हत्येसंबंधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे इत्यंभूत माहिती होती. परंतु त्यांनी ती माहिती जाणीवपूर्वक दडवून ठेवली, असा खळबळजनक आरोप भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे. तसेच दोन्ही सभागृहात कोणतीही माहिती देण्यास देशमुख तयार नव्हते. म्हणून मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अनिल देशमुख यांचीही चौकशी करावी म्हणजे या प्रकरणातील सत्यस्थिती उघड होईल, अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना दरेकर यांनी राज्यातील विविध राजकीय घडामोडीवर भाष्य केले. संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर दरेकर म्हणाले की, ते वेडसर झाले आहेत. सकाळ, दुपार, संध्याकाळ संजय राऊत देवेंद्र फडणवीसांवर बोलत असतात. आज महाराष्ट्रात सर्वाधिक नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलत आहेत. सर्वाधिक दखल देवेंद्र फडणवीसांची घेतली जातेय. सगळ्यांना देवेंद्र फडणवीसांची राजकीय भीती आहे. म्हणून त्यांना चौफेर घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु अशा प्रकारच्यांना पुरून उरण्याची क्षमता आणि ताकद फडणवीसांत आहे. आम्ही सारे त्यांच्यासोबत आहोत. दखल तुम्ही घेण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनता फडणवीसांची चांगल्या अर्थाने दखल घेतेय. जनतेचे आशीर्वाद फडणवीसांच्या मागे आहेत. संजय राऊत राज्यसभेत खूप वर्ष आहेत. खासदाराला शोभेल असे वक्तव्य त्यांनी करावे.
दरेकर पुढे म्हणाले, खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत कायदेशीररित्या आली आहे. आमदार, पदाधिकारी, पक्षाचे नाव, चिन्हही आले. कायदेशीर दृष्टीने शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे हे प्रकाश आंबेडकरांचे मत योग्य आहे. ते विधिज्ञ आहेत. कायद्याच्या दृष्टीने बोलत असतात. शिवसेना शिंदेंचीच आहे हे त्यांचे विधान खरे आहे.
मनसेने जाहीर केलेल्या उमेदवार घोषणेवर दरेकर म्हणाले की, कोणते उमेदवार, कुणाला उमेदवारी जाहीर करायचे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. महायुतीचा विषय होईल त्यावेळी महायुतीतील जागावाटपावर घटक पक्षांशी चर्चा होईल त्यानंतर कोण कुठून उभे राहील हे ठरेल. अजून महायुतीतील जागावाटप नक्की झालेले नाही. कोणी कुठून लढायचे हे अंतिम ठरलेले नाही. तसेच राज ठाकरे यांनी लोकसभेला माझा पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी असल्याचे जाहीर केले होते. आता त्यांनी स्वतंत्र जागा लढविण्याचे जाहीर केलेय. महायुतीत अंतिम काही ठरलेले नाही. राज ठाकरे आणि महायुती एकत्र येणार नाही, बोलणी चालू नाहीतच असे काही मानायचे कारण नाही. त्यांचा पक्ष आहे पक्षाला उभारी देण्यासाठी २२५-२५० जागा लढण्याची चाचपणी केली आहे त्यादृष्टीने ते तयारी करत असल्याचे दरेकरांनी स्पष्ट केले.
तसेच एकदा गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा करायला लावणारा किंवा त्या गुन्ह्याच्या मागे असणारा माणूस फार महत्वाचा असतो. जर कुणाला मणिपूरची घटना होईल असे वाटत असेल आणि त्या संदर्भात त्यांची भुमिका असेल. कळत न कळत हातभार लागणार असेल तर त्यांच्यापासून सावध झाले पाहिजे हे राज ठाकरेंचे म्हणणे अत्यंत योग्य आहे. विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर समरजीत घाटगे यांना रिंगणात उतरवण्याची तयारी शरद पवार गटाने सुरु केल्याच्या चर्चावर दरेकर म्हणाले की, समरजीत घाटगे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. शरद पवारांनी कितीही खुणावले तरी त्याला ते दाद देणार नाहीत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या बैठकीत अदानी उद्योग समूहाचे अधिकारी उपस्थित होते अशी चर्चा सुरू असून ठाकरे गटात धाकधूक आहे. यावर बोलताना दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी यावर भुमिका स्पष्ट करावी. एका बाजूला पवारांच्या मांडीला मांडी लावून बसायचे आणि दुसऱ्या बाजूला पवारांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करायचा. नेमकी तुमची भुमिका काय ते सांगा. पवार अदानीसाठी गेले असतील तर तुमची भुमिका पवार, महाविकास आघाडी संदर्भात काय आहे? हे राज्यातील जनतेला कळू द्या. स्वार्थी भावनेने भुमिका घेऊ नका. स्पष्ट भुमिका मांडा, असे आवाहनही दरेकरांनी यावेळी ठाकरेंना केले.
